८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी नोटाबंदी जाहीर केली त्याच्या बरोबर एक आठवडा आधी तेलंगणच्या सिद्दीपेट जिल्ह्यातल्या धर्मारम गावच्या ४२ वर्षीय वरदा बालय्यांनी त्यांची एक एकर शेतजमीन विकायला काढली होती. सिद्दीपेट आणि रामायमपेटला जोडणाऱ्या महामार्गाला लागूनच त्यांचा हा जमिनीचा तुकडा आहे.
ऑक्टोबरच्या अवकाळी पावसाने त्यांचं मक्याचं पीक उद्ध्वस्त केलं. सावकारांकडून आणि आंध्र बँकेकडून घेतलेल्या कर्जावरचं व्याज वाढत चाललं होतं. एकूण ८-१० लाखाचं कर्ज झालं होतं. हातात पैसा नसताना देणेकऱ्यांना सामोरं जावं लागू नये म्हणून त्यांनी त्यांच्या चार एकर रानापैकी सगळ्यात फायदेशीर असलेला एक एकराचा तुकडा विकायचं ठरवलं.
“जमिनीला खरीददार मिळाला आहे,” त्यांनी त्यांच्या थोरल्या मुलीला, शिरीषाला सांगितलंही होतं. फक्त नोटाबंदी होण्याआधी.
२०१२ मध्ये बालय्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. शिरीषाच्या लग्नासाठी त्यांनी ४ लाखाचं कर्ज काढलं होतं. त्यात त्यांनी चार बोअरवेल खणण्यासाठी अजून २ लाखाचं कर्ज काढलं. त्यातल्या तीन बोअरला पाणीच लागलं नाही. या सगळ्यामुळे त्यांच्यावरचा कर्जाचा बोजा वाढत चालला होता.
काही महिन्यांपूर्वी बालय्यांची धाकटी मुलगी १७ वर्षांची अखिला कॉलेजमध्ये १२ वीत गेली; तेव्हाच तिच्या मोठ्या बहिणीचं लग्नही झालं. बालय्यांना अखिलाच्या लग्नाची काळजी लागून राहिली होती. तसंच आतापर्यंत झालेलं कर्जही त्यांना फेडायचं होतं.




