१५ मार्चला मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील येल्लोरी गावात गारपीट झाली तेंव्हा रावसाहेब वाळके नुकतेच आपल्या शेतातून घरी निघाले होते. “गारा भल्या मोठ्या होत्या आणि प्रचंड जोरात खाली कोसळत होत्या. माझं नशीब बरं की मी कडब्याखाली लपून बसलो; पण आजूबाजूला पक्षी ओरडायले होते.”
१९ मिनिटांनंतर जेंव्हा ७० वर्षीय रावसाहेब उठून उभे राहिले तेंव्हा त्यांना आपलं शेत ओळखू येईना. “मेलेले पक्षी, उन्मळून पडलेली झाडं, उद्ध्वस्त झालेले टमाटे आणि जखमी प्राणी”, वाळके म्हणतात, “झालेल्या नुकसानीवर माझा विश्वास बसेना. मला वाटत होतं की माझ्या शेतात मेलेल्या पक्ष्यांचा खच पडला होता. त्यापैकी एकावरही पाय पडू न देण्याची काळजी घेत मी जात होतो.” आपल्याला कुठलीही मोठी जखम झाली नाही, याचंच काय ते समाधान होतं.
पण त्यांचं समाधान फार काळ टिकलं नाही. वाळके यांची ११ एकरांची दोन वेगवेगळी रानं आहेत. घरी परतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, त्यांची धाकटी सून, २५ वर्षीय ललिता, त्यांच्या दुसऱ्या रानातून परतत असताना वादळात अडकली होती. “हातात टोपली असल्याने तिला आडोशाला लपून बसता आलं नव्हतं. गारपीट एवढी भयंकर होती की, तिची तीन बोटं कापली गेली होती.”
वाळके यांच्या कुटुंबात १७ सदस्य आहेत. वादळ शांत होताच ललिताला इस्पितळात हलविण्यात आलं. “तिची उजव्या हाताची तीन बोटं गेली. शिवाय, भरपूर रक्तस्राव झाला. सध्या ती माहेरी आहे.”






