“लोक घासाघीस करतात ना तेव्हा मला मजा वाटते,” कुप्पा पप्पला राव म्हणतात. आंध्र प्रदेशातल्या विशाखापटणम जिल्ह्यात ते थाटी मुंजालु म्हणजेच ताजे ताडगोळे विकतात. “अनेक जण मोठ्या गाड्यांमधनं येतात, तोंडावर छानसा मास्क असतो, आणि तेच मला ५० रुपयांवरून ताडगोळ्यांची किंमत ३०-४० वर आणायला सांगतात,” हसत हसत ते सांगतात.
त्या वाचवलेल्या २० रुपयांचं हे लोक काय करत असतील असा प्रश्न पाप्पला रावांना पडतोच. “त्यांना बहुधा हे लक्षातच येत नाही की त्यांच्यापेक्षा मला या पैशाची किती जास्त गरज आहे ते. एरवी तेवढ्या पैशात घरी जायचं बसचं तिकिट घेऊ शकतो मी.”
तोंडाला खाकी रंगाचं ‘संरक्षक’ कापड बांधलेले ४८ वर्षांचे पाप्पला राव इतर अनेक ताडगोळा विक्रेत्यांप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग १६ वर, विशाखापटणम शहरातल्या इंदिरा गांधी झूऑलॉजिकल पार्कजवळ ताडगोळे विकत होते. गेली २१ एप्रिल आणि मे हे दोन महिने ते ताडगोळे विकायचं काम करतायत. “गेल्या वर्षी आम्ही दिवसाला ७००-८०० रुपये कमावलेत – ताडगोळे कधीच आम्हाला निराश करणार नाहीत,” ते म्हणतात.
यंदा मात्र ताडगोळे विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला कारण हे मोलाचे दोन महिने कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे त्यांच्या हातून गेले. मेच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना त्यांचा धंदा सुरू करता आला. “आम्हाला फळंही विकता आली नाहीत आणि कुठे कामालाही जाता आलं नाही,” पाप्पला रावांच्या पत्नी, ३७ वर्षांच्या कुप्पा रमा सांगतात. त्या एका ग्राहकाला डझनभर ताडगोळे बांधून देतायत. रमा आणि पाप्पला विशाखापटणम जिल्ह्यातल्या आनंदपुरम मंडलातल्या त्यांच्या गावाहून एकत्र २० किलोमीटर प्रवास करून इथे येतात.
“यंदा विक्री फार काही बरी झाली नाहीये. आम्ही दिवसाला कसेबसे ३०-३५ डझन ताडगोळे विकू शकतोय,” रमा सांगतात. “दिवस अखेर, खायचा, प्रवासाचा खर्च वगळता आमच्या हातात २०० ते ३०० रुपये येतात,” पाप्पला राव सांगतात. गेल्या वर्षी दिवसात ४६ डझन फळं विकल्याचं त्यांना लक्षात आहे. या वर्षी ते आणि रमा फक्त १२ दिवस, १६ जूनपर्य़ंत ताडगोळे विकू शकले. हंगाम संपत आला तसं जून महिन्यात दिवसाला फक्त २० डझनापर्यंत धंदा उतरला.









