“दीदी, कृपी करून काही तरी करा नाही तर ते कधीही माझा जीव घेतील!” गिरिजा देवीला मी पहिल्यांदा भेटले तेव्हाचे तिचे हे शब्द. “मी स्वतःला या छोट्या अंधाऱ्या खोलीत कोंडून घेतलंय, कालपासून. जेणेकरून ते मला मारहाण करणार नाहीत,” ती रडू लागते.
खरकट्या भांड्यांचा ढीग ओलांडून मी गिरिजाच्या खोलीपर्यंत गेले. सासरच्यांपासून जीव वाचवण्यासाठी तिने स्वतःला इथे कोंडून घेतलं होतं. या खोलीच्या बाहेर स्वयंपाकघर आणि तिचा नवरा आणि मुलं जेवतात ती मोकळी जागा.
३० वर्षांच्या गिरिजाचं हेमचंद्र अहिरवार, वय ३४ याच्याशी लग्न होऊन १५ वर्षं झाली आहेत. त्यांना १४, ११ आणि ६ वर्षं वयाची अशी तीन अपत्यं आहेत.
सासरच्यांच्या अन्याय्य मागण्यांना गिरिजाने विरोध करायला सुरुवात केली आणि या सगळ्याला सुरुवात झाली. तिने नोकरी सोडून द्यावी ही त्यातलीच एक. उत्तर प्रदेशातल्या महोबा जिल्ह्यातल्या कबरई तालुतक्यातल्या बसरोरा गावी गिरिजा राहते आणि तिथेच ती आशा कार्यकर्ती म्हणून काम करायला लागली. त्यानंतर हे सगळं जास्तच वाढलं. आणि आता टाळेबंदीच्या काळात तिचे सासू-सासरे गावी रहायला आल्यावर तर हे सगळं असह्य झालं आहे.
“टाळेबंदीच्या आधी सगळं व्यवस्थित होतं कारण ते दोघंही [सासू-सासरे] दिल्लीत होते,” गिरिजा सांगते. ते तिथे मजुरी करायचे. “पण जेव्हापासून ते आलेत, मला जगणं अशक्य झालंय. पूर्वी मी गावातल्या गरोदर बायांच्या घरभेटीला जायचे, किंवा त्यांना घेऊन दवाखान्यात जायचे तेव्हा त्यांचा आरोप असायचा की मी इतर पुरुषांना भेटायला चाललीये.” आम्ही गच्चीत जात होतो तेव्हा तिचा ६ वर्षांचा मुलगा योगेश आमच्या मागेमागे आला.
गिरिजाचे ओठ आणि डोळे रडून सुजले आहेत. ती आणि हेमचंद्र एकत्र कुटुंबात राहतात. त्याचे दोन काका आणि त्यांची कुटुंबं असे सगळे एकाच घरात राहतात. अर्थात वेगवेगळ्या भागात आणि चुलीही वेगळ्याच आहेत. अर्थात अंगण आणि आत यायचा दरवाजा एकच आहे.







