“हे असं थोडं थोडं करून मारण्यापेक्षा देवाने एकदाच काय तो आमचा जीव घ्यावा,” अझहर खान म्हणतात. २६ मे रोजी आलेल्या भरतीच्या लाटांनी मौसुनी बेट वेढून टाकलं आणि त्यात त्यांचं घर वाहून गेलं.
त्या दिवशी दुपारी भरती होती, बंगालच्या उपसागरात वादळ तयार झालं आणि त्याचा परिणाम म्हणून मुड़ी गंगा नदीमध्ये उंचच उंच, नेहमीपेक्षा १-२ मीटरने उंच लाटा तयार व्हायला लागल्या. पाण्याला उधाण आलं आणि किनाऱ्यांवरचे बांध फोडून पाणी या सखल भागातल्या बेटामध्ये शिरलं, वाटेतली घरं आणि शेतं पोटात घेत.
नैऋत्य मौसुनीपासून सुमारे ६५ सागरी मैलांवर ओडिशाच्या बालासोरमध्ये यास चक्रीवादळ धडकलं तेव्हाच, २६ तारखेच्या दुपारी हे वादळ तयार झालं होतं. यास हे अतितीव्र चक्रीवादळ होतं आणि वाऱ्याचा वेग ताशी १३०-१४० किलोमीटर इतका होता.
“आम्ही वादळ येताना पाहत होतो पण आम्हाला वाटलं की आम्ही वेळेत सगळा पसारा हलवू शकू. पण तितक्यात पाणी गावात घुसलं,” बाघडांगा मौझा (गाव) इथल्या माजुरा बीबी सांगतात. त्या मौसुनीच्या पश्चिमेला मुड़ी गंगा नदीच्या बांधालगत राहतात. “आम्ही जीव वाचवायला पळालो, पण एकही वस्तू वाचवू शकलो नाही. आमच्यातले कित्येक जण जीव वाचवण्यासाठी झाडांवर चढून बसले होते.”
सुंदरबनच्या चार गावांना – बाघडांगा, बलियारा, कुसुमतला आणि मौसुनी – जाणाऱ्या बोटी आणि लाँच अखंड पावसामुळे तीन दिवसांपूर्वीपासूनच बंद केल्या होत्या. २९ मे रोजी सकाळी मी मौसुनीला पोचलो तेव्हा बराचसा भाग पाण्याखालीच होता.
“आमची जमीन खाऱ्या पाण्याखाली गेलीये,” बागडांगाच्या निवारा शिबिरात भेटलेले अभिलाष सरदार सांगतात. “आम्हा शेतकऱ्यांच्या पोटावरच पाय आलाय,” ते म्हणतात. “आता पुढची तीन वर्षं आमच्य शेतात मला काहीही पीक घेता येणार नाही. आणि परत ती आधीसारखी सुपीक व्हायला सात वर्षं तरी लागतील.”





















