अमिताभ बच्चन म्हणतात की जर जनगणना सर्वेक्षकांनी जर कधी त्यांना त्यांची जात विचारली तर त्यांचं उत्तर असेलः जात – भारतीय. अर्थात, माध्यमांचं बॉलीवूड प्रेम चेतवण्याहून थोडं अधिक काही तरी यातनं घडावं. श्याम महाराज काही बच्चन नाहीत. ना त्यांचे भाऊ, चैतन्य महाराज. मात्र जनगणना सर्वेक्षकांनी त्यांना हा प्रश्न विचारलाच तर ते आणि त्यांचे बांधव याहून अधिक गहन उत्तरं देतात आणि प्रश्नही विचारतात. “आमचं उत्तरः आम्ही अजात आहोत. आणि हे सिद्ध करण्यासाठी हा माझा शाळा सोडल्याचा दाखला. अर्थात तुम्हाला जे लिहायचंय ते लिहायला तुम्ही मोकळे आहात,” अमरावती जिल्ह्याच्या मंगरूळ (दस्तगीर) गावातल्या आपल्या घरी चैतन्य प्रभू आम्हाला सांगतात.
अजात याचा शब्दशः अर्थ अ-जात, जात नसलेले. अजात ही १९२० आणि ३० च्या दशकातली एक बुलंद सामाजिक चळवळ होती आणि ती अगदी जोमात असताना आताच्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये या चळवळीचे हजारो समर्थक होते. एका बहुढंगी आणि विक्षिप्त सामाजिक सुधारकाच्या नेतृत्वाखाली ही चळवळ जोर धरत होती. गणपती भाबुटकर, ज्यांना सगळे गणपती महाराज म्हणून ओळखत. चैतन्य महाराज आणि श्याम महाराज हे त्यांचे हयात असलेले नातू. दारूबंदी आणि हिंसामुक्ती या नेहमीच्या उद्दिष्टांसोबत गणपती महाराजांनी इतर काही गोष्टी चळवळीशी जोडून घेतल्या. ते थेट जातीलाच भिडले. त्यांच्या आवाहनावरून अनेकांनी मूर्तीपूजा बंद केली. स्त्री पुरुष समानता यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि अगदी खाजगी मालमत्तेचाही त्यांनी विरोध केला. आणि मग १९३० मध्ये त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी स्वतःला ‘अजात’ घोषित केलं.
ते ज्या गावांमध्ये काम करत होते तिथे जाती-जातींच्या संमिश्र भोजनाने गदारोळ माजला. त्यांचे एक शिष्य पी. एल. निमकर सांगतातः “ते त्यांच्या सगळ्या शिष्यांना आपापल्या घरून तयार शिजलेलं अन्न घेऊन यायला सांगायचे. हे सगळं अन्न ते एकत्र कालवायचे आणि मग तेच प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायचे.” त्यांचा मुख्य निशाणा होता जात. “आंतर-जातीय विवाह आणि विधवा पुनर्विवाह हेच त्यांचं ध्येय होतं आणि ते त्यांनी साध्य केलं,” प्रभू सांगतात. “आमच्या स्वतःच्या कुटुंबात, थेट आमच्या आजोबांपासून आम्ही ११ वेगवेगळ्या जातींमध्ये विवाह केले आहेत, ब्राह्मणांपासून ते दलितांपर्यंत. आणि आमच्या गोतात तर अशी असंख्य लग्नं झाली आहेत.”
गणपती महाराजांनी स्वतः असा विवाह केला होता. त्यांनी “मानव धर्म तयार केला आणि इथलं मंदिर दलितांसाठी खुलं केलं, वरच्या जातींना मिरच्या झोंबल्याच,” श्याम महाराज सांगतात. “त्यांच्याविरोधात केसेस टाकल्या गेल्या आणि त्यांची केस कुणी घेईनाच. त्या काळी इथले सगळे वकील ब्राह्मण होते.”






