चिकनपाड्यात रात्री १०:३० ला जागरण सुरू झालं. बाकीचा पाडा झोपला असला तरी सानद परिवारात मात्र गाणी आणि मंत्र म्हणणं सुरूच होतं.
प्लास्टिकच्या चवाळीवर काळू जंगली बसले होते. ते शेजारच्या पांगरी पाड्यावरून या कार्यक्रमासाठी आले होते. त्या विटा-मातीच्या घराच्या ओसरीवर पाहुणे म्हणून आलेले बरेच क. ठाकूर आदिवासी जमिनीवर किंवा प्लास्टिकच्या खुर्च्यांवर बसलेले होते. ते वणीदेवीच्या रात्रभर चालणाऱ्या जागरणाला आले होते.
खोलीच्या मध्यभागी, पन्नाशीच्या काळूने मांडलेलं पूजेचं साहित्य होतं; त्यात तांदळावर तांब्याचा कलश, त्यावर ठेवलेला आणि लाल कपड्याने (स्थानिक भाषेत ‘ओरमाल’) झाकलेला नारळ आणि उदबत्त्या होत्या.
“भगताने दिलेल्या औषधांचा परिणाम म्हणून रुग्ण बरा होत आल्यावर आणि त्याला नजर लागू नये म्हणून हा विधी केला जातो,” काळूसोबत आलेले चिकनपाड्याचे पिढीजात भगत जैत्या दिघा म्हणाले.












