चारुबाला कालिंदींच्या हातातला रंगीत गमजा एखाद्या वीजप्रमाणे लककन् चमकून जातो. झुमुर गीतावरती लाल आणि निळ्या रंगाचा घागरा थिरकतो. या खेळातले साथीदार एका वाद्यांवर एक ठेका धरतात.
खेळ पहायला ८०-९० लोक – आबालवृद्ध, स्त्रिया, पुरुष – जमलेत. पश्चिम बंगालच्या अर्शा तालुक्यातल्या सेनाबाना गावी हा खेळ सुरू आहे. वयाची पासष्टी गाठली असली तर चारुबाला झोकात नाचतायत.
असं म्हणतात की ‘झुमुर’ हा शब्द नर्तकींच्या पायातल्या पैंजणांच्या आवाजावरून आलाय. नाचाचा हा प्रकार पश्चिम बंगालच्या नैऋत्येकडच्या भागात आणि शेजारच्या झारखंडमध्ये लोकप्रिय आहे (आसाममध्ये याचाच वेगळा प्रकार सादर केला जातो). पारंपरिक झुमुर गीतं लिहिणारे बहुतेक सगळे कवी दलित जातींमधले होते आणि त्यांची काही पदं सामाजिक मुद्द्यांबद्दल, दुष्काळ, पूर, राजकारण आणि इतर समस्यांबद्दल असतात. राधा आणि कृष्णामधलं प्रेम हा तर झुमुर गीतांमधला नेहमीचा विषय असतो.
चारुबालाचं स्वतःचं आयुष्यही या सगळ्या गोष्टींना स्पर्शून जातं. त्या पूर्वी पुरुलिया जिल्ह्याच्या पुरुलिया २ तालुक्याच्या बेल्मा गावी रहायच्या. त्या १६-१७ वर्षांच्या असताना त्यांचे वडील मोहन कालिंदी यांनी त्यांचं लग्न जवळच्याच डुमडुमी गावातल्या शंकर कालिंदींशी लावून दिलं. चारुबालांचं कुटुंब कालिंदी समुदायात येतं ज्यांची नोंद काही राज्यांमध्ये अनुसूचित जातींमध्ये केली गेली आहे.
शंकर विशीत होते आणि ते मिळेल ती कष्टाची कामं करायचे. मात्र त्यांचा स्वभाव हिंसक निघाला. त्यांची मारहाण इतकी प्रचंड वाढली की चारुबाला त्यांना सोडून आपल्या वडलांकडे परत आल्या. मात्र मोहन यांनी गरिबीमुळे त्यांना पोसणं शक्य नाही हे कारण देत त्यांना घरी घ्यायला नकार दिला. चारुबाला बेघर झाल्या, काही काळ अगदी रस्त्यावरही राहिल्या.

















