गुंजी गावातले कोरीव काम केलेले लाकडी दरवाजे पहाटे ४.४५ ला एक एक करत उघडतात आणि पाण्याच्या बाटल्या हातात घेऊन लोक बाहेर पडू लागतात. प्रातःविधीसाठी काही वर्षांपूर्वी हातात पत्र्याचा किंवा स्टीलचा डबा असायचा त्याची जागा आता ‘वापरा अन् फेका’ प्लास्टिकच्या बाटल्यांनी घेतली आहे.
एकमेकांना हसून रामराम करत ते वेगवेगळ्या शेतांमध्ये पांगतात. यातली अनेक शेतं पडीक आहेत कारण शेतमालक स्थलांतर करून बाहेरगावी गेलेत. झुंजुमुंजुला लवकर उठलेले काही प्रातःविधी उरकून रिकाम्या बाटल्या हातात घेऊन परतायत.
या कामासाठी सगळ्यात चांगली जागा म्हणजे दाट अशा झाडोऱ्यामागे. अर्थात ३,२०० मीटरच्या उंचीवर या जागा तशा कमीच. त्यामुळे लवकर उठणाऱ्यांनाच या मोक्याच्या जागा मिळतात. अपी पर्वतरांगांची बर्फाच्छादित शिखरं केशरी होत फटफटू लागलं की गुंजीवासियांच्या उठाबशा सुरू होतात.
तिथनं जवळच कुती-यांक्ती नदीचा खळखळाट कानी पडतोय. घोड्यांच्या गळ्यातल्या घंटा दगडी रस्त्यावर त्यांच्या नालांच्या टापांशी ठेका धरतायत. त्यांचे मालक किंवा गुराखी ५० किलोमीटरवरच्या गर्बाधारला गुरं घेऊन चाललेत. याच भागात भारत-चीन सीमेपार चालणाऱ्या निर्यातीचा माल घेऊन जाण्यासाठी ते तिथे वाट पाहत थांबतील – इथनं सीमा फक्त २२ किलोमीटरवर आहे.








