पारीवरच्या ओवी संग्रहातल्या या सहा ओव्यांमधल्या एका ओवीतली ही गाईची लेकरं म्हणजे शेतकरी आणि त्याचं जितराब. पुणे जिल्ह्यातल्या निमगाव केतकीच्या फुलाबाई भोंग पाऊस न पडल्यामुळे सारे कसे चिंतेत आहेत ते तर सांगतातच पण पाऊस पडल्यावर कसा आनंद पसरतो तेही मांडतात.
ओवी संग्रहातल्या या वेळच्या ओव्या पावसाशिवाय कसं वाटतं आणि पाऊस आल्यावर काय स्थिती होते ते सांगतात. फुलाबाईंच्या खर्जातल्या या ओव्या अतिशय गोड आणि ओठावर पटकन रुळणाऱ्या आहेत.
पहिल्याच ओवीत फुलाबाई मेघराजाचे आभार मानतायत. त्या म्हणतायत, तू असाच पडत रहा म्हणजे माझ्या बैलाला तासाला पाणी प्यायला मिळेल. त्याला तळ्याला जायची गरज नाही.
दुसऱ्या ओवीत फुलाबाई म्हणतात मेघराजाने काळी घोडी सजवलीये (काळे ढग) आणि ती काळी घोडी पाहून पृथ्वी हर्षोल्लासाने वेडी झालीये.




