“इथल्या गावातल्या शाळेत शिक्षण तेवढं काही चांगलं नाही. म्हणून मी माझ्या मुलींना वाराणसीला घेऊन गेलो. पण तिथे शहरात शाळेत प्रवेश मिळाला पण तीन महिन्यातच त्यांना घेऊन मला गावी परतावं लागेल असं कुणाला तरी वाटलं होतं का?” अरुण कुमार पासवान सांगतो. उत्तर प्रदेशातल्या वाराणसीमधल्या एका खानावळीत स्वैपाकाचं काम करणारे पासवान यांना महिन्याला १५,००० रुपये कमवत होते. पण कोविड-१९ मुळे टाळेबंदी जाहीर झाली आणि मार्चपासून त्याचं काम सुटलं.
मेच्या सुरुवातीला जेव्हा आपल्या कुटुंबासाठी अन्नाची सोय करणं अशक्य व्हायला लागलं तेव्हा पासवाने बिहारच्या गया जिल्ह्यातल्या आपल्या गावी – वाराणसीहून २५० किलोमीटरवर मायापूरला परतायचं ठरवलं. “उद्या पहाटे ३ वाजता मी, माझं कुटुंब आणि इतर काही जण निघायचं ठरवलंय,” ८ मे रोजी पासवान याने मला फोनवर सांगितलं. “आम्ही सीमेपर्यंत [उत्तर प्रदेश-बिहार] चालत जाऊ आणि तिथून बस पकडू. तिथून बसची सोय केलीये असं म्हणतायत. आणि वाटेत एखादा ट्रक भेटला, तर त्याला सीमेपर्यंत सोडायला सांगू.”
पासवान, त्यांची पत्नी २७ वर्षीय सबिता आणि तिघं चिल्लीपिल्ली – रोली, वय ८ आणि रानी, वय ६ या दोघी मुली आणि ३ वर्षांचा आयुष दुसऱ्या दिवशी सकाळी गावाकडे जायला निघाले. ते राज्याच्या सीमेपलिकडे असलेल्या करमनासा चौकीपर्यंत – ५३ किलोमीटर – चालत गेले. तिथे बिहारच्या कैमूर जिल्हा प्रशासनाने लावलेल्या आरोग्य शिबिरात तपासणी करून ताप नसेल तरच त्यांना बसमध्ये चढायची परवानगी मिळणार होती. “नशिबाने आम्हाला तिथे राज्य शासनाची बस मिळाली, गयेपर्यंत,” ११ मे रोजी मायापूरला पोचल्यावर त्यांनी मला सांगितलं. गयेला पोचल्यावर त्यांनी गावी जाणाऱ्या बसची वाट पाहिली आणि गावी पोचल्यावर आता ते स्व-विलगीरकरणात आहेत.
रानी घरी परतल्यावर खुश आहे पण रोलीला मात्र ‘शेहेरवाला स्कूलच्या’ गणवेशाची आठवण येतीये, पासवान सांगतो.
ऑगस्ट २०१९ पासून पासवान ज्या खानावळीत काम करत होते, ते सर्वात आधी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूमुळे बंद झालं, आणि मग परत २५ मार्च रोजी जेव्हा संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर झाली. त्यांना मार्चच्या मध्यावर पगार मिळाल तो शेवटचा. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गोष्टी जास्तच अवघड व्हायला लागल्या. वाराणसीचे जिल्हा अधिकारी अन्नधान्याची पाकिटं वाटत होते, ती घेण्यासाठी त्यांना दिवसातून दोनदा लांबलचक रांगांमध्ये उभं रहावं लागायचं.
पण ८ मे रोजी पासवान यांनी मला सांगितलं, “गेले ४ दिवस आम्हाला अन्नाची पाकिटं मिळाली नाहीयेत. खायला अन्नाचा कण नाहीये. त्यामुळे आता गावी जाण्यावाचून पर्याय नाही.”






