फोन उचलला गेलाच नाही पण ३० सेकंदांची कॉलर ट्यून नेमाने सांगत होती: “विषाणूचा प्रादुर्भाव टाळणं शक्य आहे.. आपले हात साबणाने नियमित धुवा आणि आजारी व्यक्तींपासून एक मीटरचं अंतर पाळा.”
मी दुसऱ्यांदा फोन केला तेव्हा त्यांनी फोन उचलला, आणि तेव्हा बाळासाहेब खेडेकर कॉलर ट्यूनने दिलेल्या सल्ल्याच्या अगदी उलट करत होते. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात ऊसतोड सुरू होती. “इकडं सगळे जण कोरोनाला घाबरायला लागलेत,” ते म्हणाले. “त्याच दिवशी मी एका बाईला मोठ्यानं रडताना पाहिलं. तिला काळजी लागून राहिली होती की तिला अन् तिच्या मुलाला लागण होऊ शकते.”
महाराष्ट्रात चालू असलेल्या अनेक कारखान्यांपैकी एक - जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यात खेडकर, वय ३९, एक मजूर कामावर आहेत. साखर 'अत्यावश्यक वस्तूं' च्या यादीत येत असल्याने २४ मार्च रोजी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनमधून ती वगळण्यात आली आहे. त्याच्या एका दिवसाआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या सीमा आणि राज्यांतर्गत वाहतूक मात्र बंद केली होती.
राज्यात एकूण १३५ साखर कारखाने आहेत - ७२ सहकारी आणि ६३ खासगी, बाळासाहेब पाटील, राज्याचे सहकार मंत्री सांगतात. “पैकी, ५६ कारखाने २३ मार्च रोजी बंद करण्यात आले आणि ७९ कार्यरत आहेत,” त्यांनी मला फोनवर सांगितलं. “कारखान्यांमध्ये येणारा ऊस अजूनही मळ्यांत तोडला जातोय. काही कारखाने मार्च अखेर गाळप थांबवतील, काही एप्रिलच्या अखेरीपर्यंत चालू ठेवतील.”
प्रत्येक साखर कारखान्याच्या क्षेत्रात ठराविक एकर ऊस असतो. कारखान्यावर तोडीला गेलेल्या मजुरांना फडांमधला ऊस कापून कारखान्यात गाळपासाठी आणावा लागतो. कारखानदार मुकादमांमार्फत ऊसतोड कामगारांना कामावर घेतात.
हनुमंत मुंढे बारामती जवळील छत्रपती साखर कारखान्याचे मुकादम आहेत. ते म्हणतात की ते मजुरांना उचल देऊन गुंतवून ठेवतात. “हंगाम संपेपर्यंत त्यांनी जेवढी उचल घेतली तेवढा ऊस कापलाय याची आम्हाला खात्री करावी लागते,” ते सांगतात.








