“एका वर्षात मी किती सुऱ्या विकतो?” कोटागिरी शहरातल्या एका गल्लीत आपल्या लोखंडी पत्रा टाकलेल्या छोट्याशा भट्टीत बसून मोहना रंगम विचारतात. “चहाच्या पानांसाठी त्यांना छोट्या पत्त्या लागतात. मोठे हाताने चालवायचे नांगर आणि लोखंडी फाळ शेतीसाठी. पण आजकाल शेती कमी आणि चहाचे मळे जास्त झालेत. कधी कधी तर मी इथे येतो आणि काहीही काम नसतं...”
रंगन, वय ४४ कोटा जमातीच्या शेवटच्या काही कोल्लेल किंवा लोहारांपैकी एक आहेत. ते तमिळ नाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातल्या पुड्डू कोटागिरी या छोट्या पाड्यावर राहातात, कोटागिरीपासून अगदी काही किलोमीटररवर. “मी गेली २७ वर्षं हे काम करतोय आणि माझ्या आधी माझा बाप, माझा आजा आणि त्यांच्या वाडवडलांनी हेच काम केलंय,” ते म्हणतात. “आमच्या घरात हेच काम केलं जातं, किती पिढ्यांपासून ते काही मला माहित नाही.”
मात्र गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू असलेलं हे काम गेल्या काही काळात - १९७१ – २००८ (या वर्षानंतर आकडेवारी उपलब्ध नाही) - चहाच्या मळ्यांचा विस्तार वाढायला लागल्यामुळे लयाला चाललंय. भारतीय चहा संघाच्या माहितीनुसार चहाखालचं क्षेत्र २२,६५१ हेक्टरवरून ६६,१५६ वर गेलं आहे. परिणामी लोहारांच्या व्यवसायाला उतरती कळा लागू लागली.






