“लोकांनी आमची टर उडवली कारण त्यांना वाटत होतं की आम्ही जे करायला निघालो होतो ते अंमळ जास्तच महत्त्वाकांक्षी होतं,” के जॉर्जकुट्टी सांगतात.
फेब्रुवारी महिना चालू आहे आणि केरळचा तप्त उन्हाळा जवळ येऊ लागलाय. के जार्जकुट्टी आणि बाबू उलहन्नन त्यांच्या तात्पुरत्या झोपडीबाहेर आराम करतायत. मधनंच एखादी थंड झुळूक येतीये पण खरं सुख देतंय ते समोरचं दृश्य – २५० एकरवरचं पोपटी रंगाचं धानाचं पीक, आणि पिकाला विभागणारे मधले पाट/कालवे. कोट्टायम जिल्ह्यातल्या पाळोम तालुक्यातल्या पनचिक्कडूच्या कोल्लाड प्रदेशातलं हे चित्र. धानाच्या पात्यातून मध्येच डोकावणारे शुभ्रधवल पक्षी आणि रानातल्या तारांवर बसलेले त्यांचे काळेभोर मित्र.
अगदी काही महिन्यांपूर्वी या हिरव्यागार शेतांच्या जागी चक्क पडीक जमिनी होत्या – तब्बल ३० वर्षांहून जास्त काळ पडीक असणाऱ्या. बाबू आणि जॉर्जकुट्टी आणि त्यांच्या सोबत सुरेश कुमार, शिबू कुमार आणि वर्गीस जोसेफ यांनी या जमिनींचा कायापालटच करून टाकला. “या सगळ्यात सर्वात अवघड म्हणजे या जमिनी कसण्यायोग्य बनवणं. पडीक जमिनीतलं तण काढणं, मशागत करणं आणि जमिनीच्या सभोवताली पाण्याचे पाट/कालवे काढणं. हे फार कष्टाचं काम आहे. नेहमीच्या रानांपेक्षा पडक जमिनी तयार करायला दहा पटीने कष्ट लागतात [आणि ट्रॅक्टर व मजुरांचे श्रम वेगळेच],” बाबू आणि २० किमीवरच्या चंगनसेरीचे त्यांचे शेतकरी मित्र, सगळेच भातशेतीतले तज्ज्ञ आहेत.










