“गीताला खूप त्रास होत होता, अंगात कणकण होती आणि चक्कर येत होती. दुसऱ्या दिवशी तिला मोठ्या उलट्या व्हायला लागल्या,” सतेंदर सिंग सांगतात.
दुसऱ्या दिवशी, १७ मे रोजी, रविवारी, काय करावं तेच सतेंदरना समजत नव्हतं. त्यांनी एका धर्मादाय संस्थेच्या अँम्ब्युलन्सला फोन केला आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलला पोचण्यासाठी मदत करायला सांगितलं. तिथे पोचल्या पोचल्या गीतांना तातडीच्या सेवा विभागात दाखल करून घेतलं आणि त्यांची कोविड-१९ ची तपासणी करण्यात आली. सोमवारी त्यांना विषाणूची लागण झाल्याचं सिद्ध झालं.
गीता यांना जठराचा कॅन्सर आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी त्या आणि सतेंदर पुन्हा मुंबईच्या परळ भागातल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलजवळच्या पदपथावर राहू लागले. त्या आधी काही आठवडे ते दोघं, इथून ५० किलोमीटर दूर डोंबिवलीला एका नातेवाइकांच्या घरी राहत होते. ही सोयसुद्धा खूप विनवण्या केल्यानंतर झाली होती. खाण्याचे आणि भाड्याचे पैसे देण्याच्या बोलीवर.
नोव्हेंबर महिन्यात ४० वर्षीय गीता आणि ४२ वर्षीय सतेंदर कोल्हापूरच्या इचलकरंजीहून मुंबईत दाखल झाले. त्यांचा मुलगा, १६ वर्षांचा बादल आणि १२ वर्षांची खुशी इचलकरंजीत सतेंदर यांच्या मोठ्या भावापाशी राहतायत. दहा एक वर्षांपूर्वी हे कुटुंब बिहारच्या रोहतास जिल्ह्याच्या दिनारा तालुक्यातल्या कनियारी गावातून इथे स्थलांतरित झालं होतं. सतेंदर इचलकरंजीच्या एका यंत्रमाग कारखान्यात काम करत होते, महिन्याला ७,००० कमवत होते. गीतांना घेऊन मुंबईला येईपर्यंत त्यांचं काम चालू होतं.
“आम्ही आमच्या मुलांना शब्द दिलाय की आम्ही लवकर परत येऊ म्हणून, पण आता त्यांचं तोंड कधी पहायला मिळेल काही सांगता येत नाही,” गीता मला मार्च महिन्यातच म्हणाल्या होत्या.
नोव्हेंबर महिन्यात जेव्हा हे दोघं मुंबईला आले, तेव्हा ते गोरेगावला सतेंदर यांच्या चुलतभावाकडे राहिले. पण कोविड-१९ ची भीतीमुळे त्यांना त्या भावाने दुसरीकडे जाण्याची विनंती केली. “आम्ही स्टेशनमध्ये आणि या फूटपाथवर राहत होतो,” मी २० मार्च रोजी गीतांना भेटले तेव्हा त्या सांगत होत्या. त्यानंतर ते डोंबिवलीला रहायला गेले. (पहा कॅन्सरग्रस्त, टाळेबंदीत, मुंबईच्या फूटपाथवर)





