दुर्दैव या गोष्टीचं की न्यायाची ही लढाई एकट्या पुतुलची नाहीये. ती दबावाला बळी पडलेली नाहीये. पुतुल जिच्या घरी घरकाम करत होती त्या माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकेने तिला पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी मदत केली. सामाजिक संस्था आणि मोहल्ल्यात राहणारी एक नातेवाइक जिच्याकडे काम करते त्यांनीही तिला पाठिंबा दिला.
“शवविच्छेदनाच्या अहवालातून सत्य बाहेर पडलं – मृत्यूचं कारण होतं विषारी वायूंमुळे गुदमरून मृत्यू,” पुतुलची नातेवाइक, दिपाली दलोई पुष्टी देते. “कंपनीने अहवालाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याचं भासवण्यात आलं. पण खरं काय ते सगळ्यांनाच माहितीये. जेव्हा कोठीच्या साहेबांनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तेव्हा त्यांनी अहवाल दुरुस्त केला.” या यंत्रणेला आमची काहीही कदर नाही, दिपाली सांगते. “दिल्लीत जर ही हालत असेल, तर दूरवरच्या खेड्यापाड्यात काय परिस्थिती असेल, तुम्ही विचार तरी करू शकता का?”
एक महिना पाठपुरावा केल्यानंतर चंदनला कामावर ठेवणाऱ्या कंपनीने पुतुलला दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली (२७ मार्च २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की १९९३ नंतर गटारं आणि सेप्टिक टँक साफ करताना मरण पावलेल्या सर्वांना रु. १० लाख नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत) आणि तिला नोकरी देण्याचंही आश्वासन दिलं.
खेदाची बाब ही की त्यांनी तिला तेच हाउसकीपिंगचं काम देऊ केलं ज्याने तिच्या नवऱ्याचा बळी घेतला होता.
“शेवटी काय,” पुतुल कडवटपणे म्हणते, “जातीचाच खेळ आहे. माझा नवरा काही मला परत मिळणार नाहीये. पण दुसऱ्या कुणालाच हे दिव्य पार करावं लागू नये अशी माझी इच्छा आहे. कुणाचंच आयुष्य असं गटारात संपू नये.
पुतुल आणि चंदन बगाडी या अनुसूचित जातीचे आहेत. पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातल्या सुंदरबनमधल्या कांदिकपूर गावाहून ते दिल्लीला आले. गावात काही कामच नव्हतं. मॉलमध्ये चंदनला रु. ९,८०० पगार होता आणि ते ३,५०० रुपये खोलीचं भाडं भरत होते.
आता अगदी निराश झालेल्या आणि जवळपासच्या बंगल्यांमध्ये स्वयंपाकाचं काम परत मिळणार नाही याची जाणीव असणाऱ्या पुतुलला सुंदरबनला परतणंही शक्य नाहीये. परत जाणार तरी कशासाठी? त्यांच्या २-२.५ बिघा रानाच्या भरोशावर तिची सासू, दीर आणि त्याचं कुटुंब कसं बसं तग धरून होते.
तिला अगदी मनापासून तिटकारा वाटत असला तरी पुतुल हे जाणून आहे की अखेर तिला सफाईचं काम स्वीकारावं लागणार आहे. “आता दुसरा काही पर्याय नाही. ही नोकरी घेतली तर मी माझ्या मुलाला चांगल्या पद्धतीने मोठं करू शकेन असं सगळे जण सांगतायत.”
अमित, पुतुलचा नऊ वर्षांचा मुलगा शाळेतून स्ट्रॉबेरी आइस्क्रीम घेऊन घरी आला. तो वसंत पब्लिक स्कूलमध्ये अपर केजीला आहे. त्याचे बाबा त्याला मॉलमध्ये पिझ्झा आणि बर्गर खायला घेऊन जायचे ते त्याला आठवतंय. आणि मग, नोव्हेंबर महिन्यातल्या त्या दिवशी अचानक त्याच्या बाबांना घरी आणलेलं त्यामे पाहिलं होतं, डोक्यापासून ते बेंबीपर्यंत संपूर्ण टाके घातलेले होते.