सईद घनी खान त्या दिवशी जवळ जवळ कोसळलेच. आपल्या रानात पिकावर फवारणी करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. ते फवारत असलेल्या कीटकनाशकाच्या वाफा नाकात गेल्याने त्यांना गरगरायला लागलं. “तेव्हाच माझ्या मनात विचार आलाः मी हे काय करतोय? मलाच जर असा त्रास होतोय म्हणजे मी असली कीटकनाशकं फवारून पिकवलेला भात खाणाऱ्यांना मी विषच खाऊ घालतोय. हे थांबवायला पाहिजे,” ते सांगतात.
१९९८ साली हा साक्षात्कार झाल्यापासून घनी यांनी रासायनिक कीटकनाशकं आणि खतं वापरणं पूर्णपणे थांबवलंय. आणि आता ते केवळ देशी वाण लावतात. “माझे वडील आणि इतर वयस्क नातेवाइक मंडळींबरोबर मी शेतात जायचो. ही मंडळी बरीच पिकं घ्यायची, मात्र त्यात देशी वाणांचं प्रमाण कमीच होतं,” ते सांगतात.
मंड्यामधे जैविक पद्धतीने देशी वाण लावणाऱ्यांची संख्या १० हून कमी असेल, कर्नाटकाच्या मंड्या जिल्ह्यातल्या किरुगावलु गावातले ४२ वर्षीय घनी सांगतात. या जिल्ह्यात ७९,९६१ हेक्टरवर भाताचं उत्पादन घेतलं जातं. “देशी वाणाचं महत्त्व कमी व्हायला लागलं कारण हे वाण सावकाश वाढतं आणि इतका काळ थांबल्यानंतरही पीक [कधी कधी] कमी येतं. आणि तुम्हाला पिकापेक्षा तणच जास्त दिसेल,” ते सांगतात.







