“हा कोविड-१९ गेला नाही तर माझ्या शेतातलं भाताचं हे शेवटचं पीक असेल,” अब्दुल रेहमान सांगतात. मध्य काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातल्या नागबल गावात आपल्या शेतात दिवसभर राबून थकले भागलेले रहमान आपल्या पत्नीने, हलीमाने स्टीलच्या पेल्यात ओतून दिलेलं पाणी पीत होते.
दहा वर्षांनंतर ते आपल्या कुटुंबाची ही एकराहूनही कमी असलेली जमीन कसत होते. “मी स्वतः इथं काम करायचं थांबवलं कारण स्थलांतर करून आलेले कामगार [मुख्यतः बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेले] कमी पैशात जास्त काम करायचे,” ते सांगतात. “पण आता, जर ‘बाहेरचे’ कामगार जर आले नाहीत, तर मला भातशेती सोडून द्यावी लागेल,” पूर्वी सरकारी नोकरदार असलेले ६२ वर्षीय रेहमान म्हणतात.
“तब्बल १५ वर्षांनी मी भातकापणीच्या वेळी रानात आलेय. आता तर भाताचं पीक कसं काढायचं हेही विसरल्यागत झालंय,” ६० वर्षांच्या हलीमा म्हणतात. गेल्या साली कापणीच्या काळात त्या दोन किलोमीटरवरच्या आपल्या घरून आपले शौहर रेहमान आणि मुलगा, २९ वर्षीय अली मोहम्मद यांच्यासाठी जेवण घेऊन यायच्या. अली एरवी रेती उत्खनन किंवा बांधकामावर रोजंदारीवर मिळेल कसं काम करतो.
मध्य काश्मिरात स्थलांतरित कामगारांना एक कनाल भात काढणीसाठी १००० रुपये मजुरी दिली जाते (८ कनाल मिळून एक एकर होतो), ४-५ जणांचा गट मिळून दिवसाला ४-५ कनाल भात काढतात. स्थानिक कामगारांना अधिक मजुरी हवी आहे – ८००० रुपये रोज. इथले चार कामगार मिळून दिवसाला १ कनाल भात काढतात (अगदी क्वचित, १-५ किंवा २). म्हणजे एका कनलमागे ३२०० रुपये मजुरी द्यावी लागते.
मार्चमध्ये टाळेबंदी लागली – तसंही ५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद १७० रद्द करण्यात आल्यानंतर काश्मीर बंदच होतं. आणि तेव्हाच सगळ्या परप्रांतीयांना २४ तासांच्या आत काश्मीर सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. याचा परिणाम म्हणजे कामं करण्यासाठी बाहेरचे स्थलांतरित कामगारच नाहीयेत. काही जण मागे राहिले होते आणि त्यांना एप्रिल-मे महिन्यात भाताच्या पेरणी आणि लावणीची कामं केली होती. पण जास्त कष्टाचं काम खरं तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये काढणीच्या काळात असतं असं इथले स्थानिक शेतकरी सांगतात.
नगबलहून दोन किलोमीटरवर असलेल्या दरेंद गावी इश्तियाक अहमद राथेर यांची ७ कनाल शेती आहे. “यंदा एक कनाल भात काढायला इथले मजूर ३,२०० रुपये मागतायत. आम्हाला हे परवडत नाही. आणि आता आम्हाला कामाला असेच कामगार मिळतायत ज्यांना भात काढायचा बिलकुल अनुभव नाहीये. पण काय करणार, पुढच्या पेरणीसाठी आम्हाला भात काढून शेतं मोकळी करून घ्यायलाच लागणार. हेच काम बाहेरून आलेले कामगार १००० रुपयांत करत होते,” इश्तियाक उकलून सांगतात.












