मीना यादव अगदी सहज वेगवेगळ्या भाषा बोलते. कोलकात्याच्या लेक मार्केट या बहुरंगी परिसरात गाडीवर मक्याची कणसं घ्यायला येणारे, रस्ता विचारायला थांबलेले लोक किंवा मित्र-मैत्रिणींशी ती अगदी मजेत भोजपुरी, बंगाली आणि हिंदीत बोलत असते. “कोलकात्यात [भाषेची] काय अडचण येत नाही,” स्थलांतरित कामगार म्हणून रोज काय काय अडचणी येतात हे मीना सांगते.
“यह सिर्फ कहने का बात है की बिहारी लोग बिहार में रहेगा. अंगमेहनतीची सगळी कामं आम्हीच तर करतो. हमाल घ्या, पाणीवाले घ्या, स्टेशनवरचे कूली पण बिहारीच आहेत. बंगाली लोकांना जमणारच नाहीत ही कामं. तिथे न्यू मार्केट, हावडा, सियालदाला जाऊन पहा... सगळी जड कामं बिहारीच करतायत. पण, इतके कष्ट करूनही त्यांना आदर मात्र मिळत नाही. बिहारी लोक सगळ्यांना बाबू म्हणतात, पण लोक मात्र त्यांना कमी समजतात. कसंय, आंब्याचा गर बंगाली माणसाला आणि कोय बिहाऱ्याला अशी गत आहे,” ती सांगत राहते.
भाषा आणि समाज म्हणून आपली ओळख याबद्दल मीना अगदी सहज आपले विचार मांडते.
“तिथे चेन्नईत आम्हाला [संवाद साधण्यात] अवघड जातं,” ती सांगते. “हिंदी किंवा भोजपुरीत बोललं तर तिथे कुणी उत्तरच देत नाही. ते त्यांच्याच भाषेत बोलतात. ती आम्हाला येत नाही. पण इथे तसं काही नाही,” मीना सांगते. “कसंय, बिहारी अशी काही एक भाषा नाहीये. घरी आम्ही ३-४ भाषा बोलतो. भोजपुरी, कधी हिंदी तर कधी दरभंगिया [मैथिली] आणि कधी कधी बांग्ला. पण दरभंगियाच खरं तर जास्त,” बिहारच्या छपराची मूळ रहिवासी असलेली ४५ वर्षीय मीना सांगते.
“आम्ही कधी कधी आरा किंवा छपरा बोलीत बोलतो. काही अडचण येत नाही. आम्हाला वाटतं त्या भाषेत आम्ही बोलतो,” बहुभाषिक मीना ‘त्यात काय एवढं’ अशा आविर्भावात सांगते. आणि तरीही आपल्याला इतक्या सगळ्या भाषा येतात हे काही विशेष कौशल्य असल्याचं तिच्या मनातही येत नाही.


















