३० वर्षीय प्रभाकर चव्हाळचं काम त्याच्या ५५ वर्षांच्या चुलत्यांपेक्षा, शिवाजी चव्हाळांपेक्षा अवघड झालंय. तसे तर दोघंही मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या मोरेगावचे शेतकरी आणि दोघंही जास्तकरून कपास पिकवतात. पण शिवाजीचा कापूस अनेक वर्षं त्यांच्यासाठी नगदी पीक ठरत होता, प्रभाकरसाठी मात्र त्यातनं फार काही पैसा हाती लागत नाही.
ही कथा एकट्या चव्हाळांची नाहीये. मराठवाड्याच्या परभणी, हिंगोली आणि औरंगाबादमध्ये प्रचंड प्रमाणावर जमीन कापूस लागवडीखाली आहे – राज्य कृषी खात्याच्या नोंदीनुसार १७.६० लाख हेक्टर. ज्वारी, तूर आणि सोयाबीन या धान्यपिकांपेक्षा या पिकातून हमखास जास्त उत्पनन हातात येत असे – आणि म्हणूनच ते ‘नगदी’ पीक मानलं जाई. पण, कापसाचा लागवडीचा खर्च गेल्या काही वर्षांत वाढलेला आहे आणि त्यातनं येणारं उत्पन्न मात्र जैसे थे असल्यामुळे कापूस हे फक्त नावापुरतं नगदी पीक राहिलं आहे.
प्रभाकर ही घसरण नीट समजावून सांगतो. त्याने एका कागदावर एका एकरात कापूस घेण्यासाठी काय काय खर्च येतो ते सगळं लिहून काढलं आहे – बियाण्याच्या एका बॅगला रु. ८००/-, खरिपाच्या पेरण्यांच्या आधी जमिनीची मशागत करण्यासाठी मजुरीवर रु. १,१०० आणि प्रत्यक्ष पेरण्यांच्या वेळी रु. ४००. जर मॉन्सूनचा पाऊस चांगला झाला तर तीन वेळा खुरपायला, रु. ३०००. खतं – रु. ३,०००. कीटकनाशक अंदाजे रु. ४०००. काढणीचा खर्च रु. ५०००.
आणि ही यादी इथेच संपत नाही. बाजारात जाऊन विक्रीसाठी प्रत्येक काढणीनंतर प्रवास खर्च आणि व्यापाऱ्याला द्यायची दलाली मिळून ३००० रुपये.
“हे सगळं मिळून एका एकरामागे २०,३०० रुपये खर्च झाला,” प्रभाकर सांगतो. या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जेव्हा कापसाची काढणी होईल तेव्हा बाजारभाव प्रति क्विंटल अंदाजे रु. ४,३०० असेल (गेल्या साली तो रु. ४०००/- इतका होता). “म्हणजे सगळा खर्च वगळता उत्पन्न झालं, रु. ३४,८००,” तो सांगतो. म्हणजे आठ महिन्यांचे काबाडकष्ट आणि गुंतवणुकीतून हाती आले एकरामागे रु. १४,५००. आता चव्हाळांना पंपाचं, बोअरवेलचं वीज बिल भरायचंय – आणि त्याच्या सहा गायींचा खर्चच महिन्याला १४००० रुपयांहन जास्त आहे.




