गुडापुरी बालाराजूनी रिक्षाचं मागचं सीट काढलंय आणि अंदाजे ७०० किलो कलिंगड लादलंय. वेमपहाड या आपल्या गावाहून ३० किलोमीटरवर असणाऱ्या कोप्पोले गावच्या वेल्लीदंडुपुडु वस्तीवरच्या एका शेतकऱ्याकडून त्यानी नुकतंच फळ खरेदी केलं आहे.
त्यानंतर नलगोंडा जिल्ह्याच्या निदामानूर मंडलातल्या अनेक गावात तो रिक्षा घेऊन जातात. काही फळं विकली जातात, १ ते ३ किलोच्या एका फळामागे १० रुपये मिळतात. बालाराजूसाठी आजचा दिवस बराच खडतर आहे. एरवी जेव्हा फळं विकायला नसतात तेव्हा ते प्रवासी वाहतूक करतात. गावकरी त्यांना गावात येऊ देईना गेलेत. “काही जण चक्क कलिंगडांना कोरोना काया [कलिंगड] म्हणायला लागलेत,” २८ वर्षीय बालाराजू सांगतो. “ते म्हणतायत, ‘इकडे येऊ नको. त्या फळांबरोबर तू विषाणू पण घेऊन येतोयस’.”
२३ मार्च नंतर – तेलंगणात याच दिवशी टाळेबंदी जाहीर झाली – त्यांची कलिंगडाच्या विक्रीतून दिवसाला जास्तीत जास्त ६०० रुपयांची कमाई झालीये. त्या आधी फळं बाजारात आल्यापासून काही आठवडे ते रोज किमान रु. १,५०० ची तरी कमाई करत होते. या भागात जानेवारीच्या सुरुवातीला कलिंगडांची लागवड करतात आणि दोन महिन्यात फळ विक्रीसाठी तयार होतं.
विक्री कमी झालीये आणि लोकांची बोलणी यामुळे बालाराजूनी आता ठरवलंय की १ एप्रिल रोजी विकत घेतलेला माल संपला की परत काही फळं विकायला बाहेर पडायचं नाही. कलिंगडाची लागवड आणि विक्री करणाऱ्या त्याच्यासारख्या इतर शेतकरी, मजूर आणि व्यापाऱ्यांना कोविड-१९ संकटाचा चांगलाच फटका बसलाय.
फळाची तोडणी आणि गाडीत लादायचं काम करणारे कामगार, यात प्रामुख्याने महिला जास्त आहेत, रोजच्या मजुरीवर अवलंबून असतात. १० टनाचा एक ट्रक लादला की ७-८ बायांच्या एका गटाला ४००० रुपये मिळतात, जे त्यांच्यात समान रित्या वाटले जातात. बहुतेक दिवशी दोन तरी ट्रक लादून होतात, कधी कधी तीन. मात्र तेलंगणातील शहरांना माल घेऊन जाणाऱ्या ट्रकची संख्या जसजशी कमी होत चाललीये तशी त्यांची मजुरीही घटलीये.










