मे महिन्याच्या शेवटी जेव्हा निखिरप्पा गडियप्पा हावोरी तालुक्यातून रात्रभर प्रवास करून रामनगरमधल्या बाजारपेठेत पोचले, तेव्हा त्यांच्याकडच्या रेशीम कोषांना चांगला भाव मिळेल अशी आशा त्यांच्या मनात होती. मात्र टेम्पोत बसून केलेल्या या ११ तासांच्या ३७० किलोमीटरच्या प्रवासात – न थांबता, आणि रस्त्यात टाळेबंदीमुळे खाण्याच्या टपऱ्याही बंद – त्यांना भीतीने ग्रासलं होतं. जर त्यांच्या कोषांना पाडून भाव मिळाला तर?
हावेरी तालुक्यातल्या हंडीगनुरला परतीच्या प्रवासात मात्र सगळी आशा मावळलेली होती – आणि खरी ठरली ती भीतीच. त्यांच्याकडचे २५० किलो रेशीम कोष केवळ ६७,५०० रुपयांना विकले गेले होते – फक्त २७० रु. प्रति किलो.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला, त्यांच्या वर्षातून दोनदा येणाऱ्या कोषांना ५५० रु. प्रति किलो आणि संकरित कोषांना सरासरी ४८० रु. प्रति किलो असा भाव मिळत होता कारण लग्नसराईच्या काळात मागणी मोठी असते. एरवी नेहमीप्रमाणे मागणी असते त्या काळातही वर्षातून दोनदा येणाऱ्या कोषांना किलोमागे ४५०-५०० रुपये इतका भाव मिळतो, तर संकरित कोषांना ३८० ते ४२० रुपये. (दुबार किंवा वर्षातून दोनदा येणारे कोष हे शुभ्र पांढरे उच्च दर्जाचे कोष असतात तर संकरित कोष पिवळसर आणि कमी दर्जाच्या दुबार धाग्याच्या मिश्रणातून तयार होतात.)
“मी [२०१४ साली] रेशमाच्या कोषांसाठी आमच्या वडलोपार्जित जमिनीत तुतीची लागवड केली. आणि आता आम्हाला कवडीमोल भावाला माल विकावा लागतोय. माझ्या डोक्यावरचं कर्ज मी कसं फेडणार आहे, कुणाला ठाऊक,” ४२ वर्षीय गडियप्पा सांगतात.
२०१४ सालापर्यंत गडियप्पा कर्नाटकातल्या हावेरी जिल्ह्यात १५०-१७० रुपये रोजाने शेतमजुरी करत होते. त्यांच्या स्वतःच्या तीन एकर जमिनीत, त्यांचं १० जणांचं कुटुंब प्रामुख्याने ज्वारी आणि भुईमुगाचं पीक घेत होतं. घरी खायला आणि बाजारात विकायला. २०१६ साली पाच एकर जमीन भाड्याने कसायला घेतली. एका तुकड्यात ज्वारी आणि भुईमूग लावला पण बाकी जमिनीवर तुतीची झाडं लावली. थोडी जास्तीची कमाई होईल अशा आशेने त्यांनी हा निर्णय घेतला होता.
गडियप्पा आणि इतर शेतकरी अंदाजे दर ३५ ते ४५ दिवसांनी रेशमाचे कोष विकतात – म्हणजेच वर्षाला सुमारे १० वेळा. चावकीला (रेशमाचा लहान किडा) कोष विणायला सुमारे २३ दिवस लागतात. हे कोष काढले त्यासाठी गडियप्पांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रेशमाचे किडे वाढवायला सुरुवात केली होती. दररोज सुमारे १० तास इतका त्यांचा वेळ या कोषांची निगा राखण्यात गेला होता. दमट हवेचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाहीये ना यावर बारीक लक्ष ठेवावं लागतं. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी ते रामनगरला ते आले होते - आणि तोटा होऊन परत गेले होते.







