आपल्याला बंदिवासात ठेवलं या धक्क्यातून खामरी अजून सावरलाच नाहीये.
“बरं व्हायला त्याला वेळ लागणार,” कम्माभाई लखाभाई रबारी सांगतात.
उंटांच्या कळपातल्या एका तरुण उंटाविषयी आमचं बोलणं सुरू होतं.
२०२२ साली जानेवारी महिन्यात अनपेक्षितरित्या अमरावती पोलिसांनी ५८ उंटांना ताब्यात घेतलं होतं. त्या पार्श्वभूमीवर कम्माभाई बोलतायत. आवाजात आशेचा सूर आहे. एक महिन्याने या उंटांना सोडलं खरं पण सगळ्या उंटांची तब्येत खालावली होती.
या उंटपाळांचं म्हणणं आहे की पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांना त्यांचा नेहमीचा आहार मिळाला नाही. त्यांना एका गोशाळेत ठेवण्यात आलं होतं. तिथे फक्त गायी-गुरांसाठी चारा आणि खाणं उपलब्ध होतं. “हे खुल्या रानात चरणारे प्राणी आहेत. ते मोठ्या वृक्षांची पानं खातात. ते काही पशुखाद्य खाणार नाहीत,” कम्माभाई म्हणतात.











