उन्हाच्या तलखीचा कसलाही परिणाम त्यांच्यावर होत नाही. किमान पन्नास वर्षांपूर्वी स्वतःच निर्माण केलेल्या या कोल्हापुरातल्या बंधाऱ्यावरच्या लहानशा पुलावर ते निश्चल बसले आहेत. थोड्या वेळापूर्वीच जेवताना आम्ही त्यांना विचारलेल्या अनेक प्रश्नांची ते निवांतपणे उत्तरं देतायत. अगद उत्साहात झटपट चालत ते आमच्याबरोबर पुलावरून फेरफटका मारतात आणि १९५९ साली तयार झालेल्या या बंधाऱ्याचं काम कसं चालतं ते आम्हाला समजावून सांगतात.
साठ वर्षं उलटलीत. गणपती ईश्वरा पाटील यांची सिंचन विषयावरची पकड आणि शेतकरी आणि शेतीची समज तसूभरही कमी झालेली नाही. त्यांना भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास माहितीये – ते स्वतः त्यात सामील होते. आज त्यांचं वय १०१ वर्षं आहे आणि भारतातल्या हयात असलेल्या काही अखेरच्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी ते एक आहेत.
“मी फक्त एक निरोप्या होतो,” १९३० पासून आजवरच्या आपल्या आयुष्याबाबत विलक्षण विनम्रतेने आणि साधेपणाने ते सांगतात. “इंग्रजांच्या विरोधात सुरू असणाऱ्या भूमिगत कारवायांचा एक निरोप्या.” बंदी घातलेले साम्यवादी क्रांतीकारी गट, समाजवाद – आणि काँग्रेस पक्षाचा (१९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या वेळी) यात समावेश होता. आणि त्यांच्या कामात ते नक्कीच माहीर असणार – कारण ते एकदाही पकडले गेलेले नाहीत. “मी तुरुंगात काही गेलो नाही,” ते म्हणतात, जवळ जवळ खेदानेच. आम्हाला इतरांकडूनच कळतं की १९७२ नंतर सरकारकडून स्वातंत्र्यसैनिकांना देण्यात येणारं ताम्रपत्र किंवा पेन्शनही त्यांनी स्वीकारलं नाहीये.







