ऑक्टोबर २०२२ मधली गोष्ट. संध्याकाळ सरायला आली होती. बेल्लारीमधल्या समाज केंद्रात एक वृद्ध, अशक्त महिला खांबाला टेकून, पाय लांबवून बसली होती. संदूर तालुक्यातली २८ किलोमीटर चढण चालून चालून ती थकली होती. दुसर्या दिवशी आणखी ४२ किलोमीटर चालायचं होतं.
संदूरमधल्या सुसीलानगर गावातल्या खाणकामगार असणाऱ्या या हनुमक्का रंगण्णा. ‘बेल्लारी झिला गनी कर्मिकारा संघ’(बेल्लारी जिल्हा खाण कामगार संघटना) या संघटनेने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या पदयात्रेत इतर अनेकांबरोबर त्याही सामील झाल्या होत्या. उत्तर कर्नाटकातल्या बेल्लारीमधल्या उपायुक्तांच्या कार्यालयात आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी हे सारे ७० किलोमीटर चालत निघाले होते. रास्त नुकसानभरपाई आणि उपजीविकेचं पर्यायी साधन या मागण्यांसाठी इतर खाण कामगारांसह रस्त्यावर उतरण्याची हनुमक्कांची गेल्या दहा वर्षांतली ही सोळावी वेळ.
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात बेल्लारीमधल्या अंगमेहनत करणार्या शेकडो महिला खाण कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आलं. हनुमक्का त्यापैकी एक. “माझं वय आज ६५ च्या आसपास असेल. पंधराहून अधिक वर्षं झाली, माझं काम गेलंय,” त्या सांगतात. “नुकसानभरपाईच्या पैशाची वाट पाहतच कित्येक जण मरण पावलेत… माझा नवराही गेला.’’
“जाणारे सुटले, आम्ही मागे उरलेले जणू शापित आहोत. आता या निषेध मोर्चासाठी आम्ही आलोय. जेव्हाजेव्हा मीटिंग असतात तेव्हातेव्हा मी आवर्जून जाते. आम्ही विचार केलाय आता हा शेवटचा प्रयत्न करू या.’’















