तालात, लयीत त्या झुलत होत्या – “रे रेला रे रेला रे रेला रे” – एकमेकींच्या कंबरेत हात अडकवलेले, एका वेळी तीन पावलं टाकतं गुडघ्यापर्यंत नेसलेल्या पांढऱ्या साड्या आणि डोक्यावर रंगीबेरंगी कंड्यांचा भार ल्यायलेल्या त्या युवती गोंड समुदायात लोकप्रिय असलेली रेला गाणी गात होत्या.
तितक्यात युवकांचा एक गट आला, तेही सफेद कपड्यात, सफेद मुंडासं आणि त्याच्यावर रंगीत पिसं अडकवलेली. क्लिष्ट अशा पदन्यासात त्यांच्या पायातल्या घुंगरांचा नाद मिसळून गेला. हातातला मांदरी नावाचा एक लहानसा ढोल वाजवत तेही रेला गीतं गात होते. एकमेकींच्या हातात हात गुंफून त्या युवतींनी या युवकांच्या गटाभोवती एक गोल तयार केला. सगळे नाचत गात राहिले.
गोंड आदिवासी असलेल्या या ४३ युवक-युवतींचा गट, सगळ्यांची वय १६-३० मधली, छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्याच्या केशकाल तालुक्यातल्या बेडमामारी गावाहून इथे आले होता.
रायपूर-जगदलपूर महामार्गालगत असणाऱ्या (बस्तर भागातल्या) या ठिकाणी पोचण्यासाठी त्यांनी ३०० किलोमीटर प्रवास केला होता. रायपूर या राज्याच्या राजधानीपासून १०० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण होतं. मध्य भारतातल्या इतर आदिवासी समुदायांमधले खास करून छत्तीसगडमधले नाचणारे हे युवा इथे तीन दिवसांच्या वीर-मेळ्यासाठी आले होते. २०१५ सालापासून १० ते १२ डिसेंबर या काळात वीर नारायण सिंग या छत्तीसगडच्या बलौंदाबाजार-भाटापारा जिल्ह्यातल्या सोनाखान इथल्या आदिवासी राजाची स्मृती जागवण्यासाठी हा मेळा आयोजित केला जातो. डिसेंबर १८५७ मध्ये इंग्रजांच्या विरोधात उठाव करणाऱ्या या राजाला पकडून रायपूर जिल्ह्याच्या जयस्तंभ चौकात इंग्रज सत्ताधाऱ्यांनी फाशी चढवलं होतं. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार त्याला फाशी दिल्यानंतर इंग्रजांनी त्याचं शव उडवून दिलं होतं.






