चाळिशीचे दगडू सांगतात की त्यांच्या कुटुंबाची थोडीफार शेतजमीन होती. पण आता मात्र दगडाचं काम हाच त्यांचा आणि त्यांच्या चुलत्यांचा व्यवसाय आहे. लक्ष्मण आणि दगडू यांच्या बायकादेखील अहमदनगरमधल्या त्यांच्या गावाजवळ रस्ते अंथरण्यासाठी खडी फोडायचं काम करतात.
वसईच्या किल्ल्यावर काम करणाऱ्या डुकरेंसारख्या इतर कामगारांना स्थानिक मुकादम कामावर पाठवतात. “ते जिथे काम आहे असं सांगतील तिथे आम्ही (आमच्या पैशाने) जातो,” लक्ष्मण सांगतात. “तिथे आम्ही एक दोन दिवस राहतो, चहा पावावर दिवस काढतो. जर काम मिळालं तर ठीकच नाही तर मुस्काटात मारल्यासारखं आम्ही वडारवाडीला वापस येतो.”
वडार असण्याबद्दल लक्ष्मण डुकरेंच्या मनात मिश्र भावना आहेत. त्यांच्या पूर्वजांबद्दल, ज्यांनी इतक्या सुंदर वास्तू उभ्या केल्या, सुंदर नक्षीकाम आणि मूर्ती घडवल्या त्यांच्याबद्दल मनात आदर आणि अचंबाही आहे. त्यांना ते “देवाची माणसं” म्हणतात. असं असूनही त्यांच्या समाजाच्या दारिद्र्याबद्दल बोलताना त्यांच्या मनात अपार दुःखही आहे. “माझ्या बापाला ही वडाराची जिंदगानी कुणी दिली? या जातीत जन्म घ्यायचा आन् हा धंदा करायचा? तो जर का शिकला असता आणि नोकरी केली असती, तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी काही तरी असती...”
लक्ष्मण डुकरेंचं वय आज ६६ वर्षांचं आहे. त्यांनी त्यांच्या वडलांकडून आणि आजोबांकडून हे काम शिकून घेतलं. ५० वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यांनीही त्यांच्या आज्या-पणज्याकडूनच ही कला घेतली. “एकदा का मुलगा १०-११ वर्षांचा झाला की त्याच्या हातात छोटी हातोडी देतात आणि ती कशी चालवायची हे त्याला शिकवलं जातात,” ते सांगतात. “अहो, त्याची बोटं तुटतात, पण मग हळूहळू काही महिन्यात तो हे काम शिकतो आणि मोठ्या माणसांसारखं तोही कामाला लागतो.”