सूर्यास्ताकडे काही त्यांचे डोळे लागलेले नाहीत. संधीप्रकाश सरतो, रस्त्यावरचे दिवे लागतात तरी आपल्या दोन खोल्यांच्या घराबाहेर बसलेल्या रंदावनी सुरवसे शून्यात नजर लावून बसल्या आहेत. कसनुसं हसून त्या सांगतात, “या इथे बसून हे त्यांच्या आवडीचे अभंग गायचे.”

विठ्ठलाची भक्तीगीतं, अभंग गात प्रभाकर सुरवसेंचा वेळ छान जायचा. दोन वर्षांपूर्वी, साठी पूर्ण झाल्यानंतर ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातून क्लार्क पदावरून निवृत्त झाले. तेव्हापासून दर रोज संध्याकाळी बीड जिल्ह्यातल्या परळीच्या आपल्या घरात प्रभाकर भजनं गायचे आणि आजूबाजूंच्यांना खूश करायचे.

हे असंच सुरू होतं, ९ एप्रिल २०२१ पर्यंत. आणि मग कोविड-१९ ची लक्षणं दिसायला लागली.

दोनच दिवसांनी त्यांना इथून २५ किलोमीटरवर असलेल्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर १० दिवसांनी श्वासासाठी तडफडत त्यांनी प्राण सोडला.

त्यांचा मृत्यू तसा अचानकच झाला. “सकाळी ११.३० वाजता मी त्यांना बिस्किट खाऊ घातलं होतं,” त्यांचा पुतण्या वैद्यनाथ सुरवसे सांगतो. ३६ वर्षांचे वैद्यनाथ परळीमध्ये चायनीज खाण्याचा गाडा चालवतात. “त्यांनी मला ज्यूस देखील मागितला. आम्ही गप्पा मारल्या. ते बरे वाटत होते. आणि मग दुपारी १.३० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.”

या मधल्या काळात वैद्यनाथ तिथे हॉस्पिटलमध्येच होते. ते सांगतात, दुपारी कधी तरी ऑक्सिजनचा दाब अचानक कमी व्हायला लागला. तोपर्यंत छान गप्पा मारणारे, उत्साहात असलेले प्रभाकर श्वास घ्यायला धडपडू लागले. “मी अजीजीने डॉक्टरांना बोलावलं, पण कुणीही लक्ष दिलं नाही,” वैद्यनाथ सांगतात. “त्यांना श्वास घ्यायला जड जात होतं, आणि थोड्या वेळातच ते गेले. मी त्यांची छाती दाबली, पाय चोळले, पण काहीच उपयोग झाला नाही.”

PHOTO • Parth M.N.
PHOTO • Parth M.N.

रंदावनी सुरवसे (डावीकडे) यांना प्रभाकर गेले आहेत हे अजून पचनी पडत नाहीये. त्यांचा पुतण्या वैद्यनाथ (उजवीकडे) यांच्या मते ऑक्सिजन कमी पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला

प्रभाकर यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे की हॉस्पिटलमधला ऑक्सिजन संपला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. “दवाखान्यात गेल्यावर त्यांची तब्येत बिलकुल बिघडली नव्हती. ते बरे होत होते. मी एक दिवस सुद्धा हॉस्पिटलमधून हलले नव्हते,” ५५ वर्षीय रंदावनी म्हणतात. “ते गेले त्याच्या एक-दोन दिवस अलिकडे तर ते मजेत म्हणायले होते की आता इथं हॉस्पिटलच्या वॉर्डातच भजनं गातो म्हणून.”

२१ एप्रिल रोजी या हॉस्पिटलमध्ये इतरही काही जणांचे प्राण गेले. याच दवाखान्यात दु. १२.४५ ते २.१५ एवढ्या दीड तासात सहा इतर पेशंट दगावले.

हे मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झाल्याचं हॉस्पिटलने नाकारलं आहे. “त्या पेशंट्सची तब्येत आधीच गंभीर झालेली होती. आणि त्यांच्यातले बहुतेक जण ६० वर्षांच्या पुढचे होते,” मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता, डॉ. शिवाजी सुक्रे माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हणतात.

“हॉस्पिटल अर्थातच नकारच देणार. पण हे मृत्यू ऑक्सिजन कमी पडल्यामुळेच झाले आहेत,” वरिष्ठ पत्रकार अभिजीत गठाळ म्हणतात. अंबाजोगाईहून प्रकाशित होणाऱ्या विवेक सिंधु या मराठी दैनिकात त्यांनी सर्वप्रथम या मृत्यूंची बातमी दिली होती. “त्या दिवशी रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटल प्रशासनावर संतापले होते. आणि त्यांचं काय म्हणणं होतं याची आमच्या सूत्रांनी खातरजमा केलीये.”

गेल्या काही आठवड्यात समाजमाध्यमांवर ऑक्सिजन सिलिंडर आणि दवाखान्यात बेड मिळण्यासाठीची मागणी वाढत चालली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून हतबल झालेले लोक ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा आधार घेत आहेत. पण ज्या भागात अशा समाज माध्यमांची फारशी चलती नाही तिथे ऑक्सिजनचा तुटवडा जास्तच असल्याचं चित्र आहे.

अंबाजोगाईच्या हॉस्पिटलमधल्या एका अधिकाऱ्यांनी ओळख उघड न करण्याची विनंती करत काही माहिती दिली. त्यांच्या मते, ऑक्सिजनची मागणी पूर्ण करणं ही रोजची तारेवरची कसरत आहे. “आम्हाला दररोज १२ मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. आणि [प्रशासनाकडून] मिळतो ७ टन,” ते सांगतात. “ही तूट कशी भरून काढायची हा याची रोज मारामारी सुरू आहे. मग आम्ही मिळेल तिथून जंबो सिलिंडर मागवतोय.” बीडच्या पुरवठादारांसोबतच जवळच्या लातूर आणि औरंगाबादसारख्या शहरांमधून देखील सिलिंडर मागवले जातायत.

राज्य शासनाने स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जाहीर केलं आहे. इथे एकूण ४०२ खाटा आहेत आणि यातल्या २६५ खाटांना ऑक्सिजनची सोय आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी परळीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पातला ऑक्सिजन प्लांट इथे हलवण्यात आला होता, जेणेकरून पुरवठ्यात वाढ होईल. सध्या हॉस्पिटलकडे ९६ व्हेंटिलेटर आहेत, त्यातले २५ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पीएम केअर्स फंडातून आले आहेत.

Left: A working ventilator at the Ambejogai hospital. Right: One of the 25 faulty machines received from the PM CARES Fund
PHOTO • Parth M.N.
Left: A working ventilator at the Ambejogai hospital. Right: One of the 25 faulty machines received from the PM CARES Fund
PHOTO • Parth M.N.

अंबाजोगाईच्या हॉस्पिटलमधला चालू स्थितीतला व्हेंटिलेटर. उजवीकडेः पीएम केअर्स फंडातून मिळालेल्या २५ नादुरुस्त यंत्रांपैकी एक

हे २५ व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचं लक्षात आलं. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईहून दोन तंत्रज्ञ स्वतः ४६० किलोमीटर प्रवास करून अंबाजोगाईला ही यंत्रं दुरुस्त करण्यासाठी आले. यातल्या ११ यंत्रांमध्ये किरकोळ दुरुस्त्या करून त्यांनी ती सुरू केली.

अंबाजोगाईच्या हॉस्पिटलमधल्या रुग्णांच्या नातेवाइकांना कल्पना आहे की सगळी तारेवरची कसरत सुरू आहे. “तुमच्या डोळ्यादेखत रोज इथे ऑक्सिजनसाठी मारामार सुरू असते, तुम्हाला चिंता वाटणं साहजिकच आहे,” वैद्यनाथ म्हणतात. “ऑक्सिजनच्या तुटवडा आहे, देशभर हीच बोंब आहे. मी सोशल मीडिया पाहतो ना, लोक कसे एकमेकांना मदत करतायत, ते पाहतोय मी. ग्रामीण भागात आमच्याकडे तोही पर्याय नाहीये. मी जरी पोस्ट टाकली तरी ती पाहणार कोण? आम्ही फक्त दवाखान्याच्या भरोशावर आहोत. आणि आम्हाला ज्याची गोष्टीची भीती होती, तेच घडलं.”

रंदावनी, त्यांची सून आणि १०, ६ आणि ४ वर्षं वयाच्या तिघी नातींना प्रभाकर यांचं नसणं सहन होत नाहीये. “पोरींना त्यांची खूपच आठवण येते. त्यांना काय सांगावं मलाच समजंना गेलंय,” रंदावनी सांगतात. “ते दवाखान्यात होते, तेव्हा मला सारखं त्यांच्याबद्दल विचारायचे. घरी यायला आतुर झाले होते ते. आम्हाला वाटलंच नव्हतं, ते जातील म्हणून.”

रंदावनी घरकाम करतात आणि महिन्याला २,५०० रुपये कमवतात. त्यांना आता लगेच कामावर जायचंय. “माझ्या कामावरची माणसं भली आहेत, त्यांनी मला कामावर या म्हणून मागे लागले नाहीत,” त्या सांगतात. “पण आता मी कामं सुरू करणारे. जरा ध्यान दुसरीकडे जाईल.”

१६ मे पर्यंत बीड जिल्ह्यामध्ये ७५,००० कोविड रुग्णांची नोंद झाली होती आणि १,४०० जणांना या संसर्गात आपले प्राण गमवावे लागले होते. शेजारच्याच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ४९,७०० रुग्णांची नोंद झाली असून १२०० मृत्यू नोंदवले गेले आहेत.

बीड आणि उस्मानाबाद हे दोन्ही जिल्हे कृषीप्रधान मराठवाड्याचा भाग आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या याच भागात झाल्या आहेत. कामाच्या शोधात इथून मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतात. पाण्याचं दुर्भिक्ष्य आणि कर्जाचा बोजा याच्याशी संघर्ष करणारा इथला माणूस तुटपुंजी संसाधनं आणि अपुऱ्या आरोग्य सेवांच्या आधारे या महासाथीला तोंड देतोय.

अंबाजोगाईहून ९० किलोमीटरवर असलेल्या उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात स्थिती फारशी काही वेगळी नाही. भर उन्हात रुग्णांचे नातेवाईक एकमेकांना आपल्या चिंता, व्यथा बोलून दाखवतायत. दररोज १४ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे आणि अनोळखी जीव एकमेकांना आधार देतायत.

Left: Swami Ramanand Teerth Rural Government Medical College and Hospital in Ambejogai. Right: An oxygen tank on the hospital premises
PHOTO • Parth M.N.
Left: Swami Ramanand Teerth Rural Government Medical College and Hospital in Ambejogai. Right: An oxygen tank on the hospital premises
PHOTO • Parth M.N.

डावीकडेः अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय. उजवीकडेः रुग्णालयाच्या आवारातली ऑक्सिजनची टाकी

२०२० साली कोविड-१९ ची पहिली लाट जोरात होती तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्याला ५५० ऑक्सिजल सिलिंडरची गरज होती असं जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर सांगतात. दुसरी लाट येणार याची चिन्हं दिसू लागताच जिल्हा प्रशासनाने ही संख्या दुप्पट करण्याचं ठरवलं.

फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरू झालेली दुसरी लाट जास्तच जोरात येऊन आदळली. पहिल्या लाटेच्या तुलनेत जिल्ह्याला तीनपट जास्त ऑक्सिजन खाटांची गरज भासायला लागली. आजमितीस उस्मानाबादमध्ये ९४४ ऑक्सिजन खाटा, २५४ अतिदक्षता खाटा आणि १४२ व्हेंटिलेटर आहेत.

लातूर, बीड आणि जालन्यातून वैद्यकीय प्राणवायू आणला जातोय. कर्नाटकातलं बल्लारी आणि तेलंगणात हैद्राबादहून देखील ऑक्सिजन आणला जातोय. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गुजरातच्या जामनगरहून हवाईमार्गाने उस्मानाबादला ऑक्सिजन आणला गेला. १४ मे रोजी उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातल्या चोराखळीमधल्या धाराशिव साखर कारखान्यामध्ये इथेनॉलपासून वैद्यकीय दर्जाचा ऑक्सिजन तयार करण्याचा देशातला पहिला प्रकल्प सुरू झाला. दररोज २० मेट्रिक टन ऑक्सिजनची इथे निर्मिती होईल असा अंदाज आहे.

शासकीय रुग्णालयात एकू ४०३ खाटा आहेत आणि त्याची सर्व देखभाल करणारे ४८ डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड सहाय्यक मिळून १२० कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये काम करत आहेत. रुग्णालयाचे अधिकारी आणि पोलिस रुग्णांच्या नातेवाइकांची समजूत काढताना दिसतात. आपल्या रुग्णापाशी बसायचा त्यांचा आग्रह आहे ज्यातून संसर्गाचा धोका अधिक आहे. रुग्णांचे नातेवाईक या हॉस्पिटलमध्ये बेड मिळतोय का याची शोधाशोध करताना दिसतायत.

हृषीकेश काटेंची आई, ६८ वर्षीय जनाबाई शेवटचे श्वास मोजत होत्या. तेव्हाच बाहेर व्हरांड्यात कुणी तरी त्यांच्या जाण्याची वाट पाहत होतं. त्या व्यक्तीचं कुणी तरी आजारी होतं आणि त्यांना बेड हवा होता. “तिला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि शेवटची धडपड सुरू होती, तेव्हा कुणी तरी बाहेर फोनवर बोलताना मी ऐकलं, की लवकरच एक बेड रिकामा होईम म्हणून,” ४० वर्षीय हृषीकेश सांगतात. “ऐकायला भयंकर वाटतं, पण त्यांना काय दोष देणार. परिस्थितीत अशी झालीये. मी त्याच्या जागी असतो तरी कदाचित तेच केलं असतं.”

हृषीकेश यांच्या वडलांना खाजगी दवाखान्यातून सिव्हिलमध्ये हलवलं होतं कारण त्या दवाखान्यात ऑक्सिजन कमी पडत होता. त्यानंतर एका दिवसात जनाबाईंना देखील इथेच दाखल केलं. “आमच्यापुढे तेवढाच पर्याय होता,” हृषीकेश सांगतात.

Left: Rushikesh Kate and his brother Mahesh (right) with their family portrait. Right: Rushikesh says their parents' death was unexpected
PHOTO • Parth M.N.
PHOTO • Parth M.N.

डावीकडेः हृषीकेश काटे आणि त्यांचे भाऊ महेश (उजवीकडे) त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या फोटोसमोर. उजवीकडेः हृषीकेश म्हणतात की त्यांचे आईवडील जातील असं कुणालाच वाटलं नव्हतं

७० वर्षीय शिवाजी काटे ६ एप्रिल रोजी कोविडमुळे आजारी पडले आणि त्यानंतर एका दिवसातच जनाबाईंना देखील लक्षणं जाणवायला लागली. “माझ्या वडलांची तब्येत जास्त बिघडली होती म्हणून आम्ही त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवलं,” हृषीकेश सांगतात. “आमच्या नेहमीच्या डॉक्टरांनी सांगितलं की आईला घरीच विलगीकरणात ठेवता येईल. तिची ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित होती.”

११ एप्रिल रोजी सह्याद्री या खाजगी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा फोन आला की शिवाजींनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत आहे. “ते व्हेंटिलेटरवर होते,” हृषीकेश सांगतात. “सिव्हिलला हलवल्या क्षणी त्यांना श्वास घ्यायला जास्तच त्रास व्हायला लागला. दवाखान्यातून हलवलं ती दगदग त्यांना सहन झाली नाही,” ते सांगतात. “मला ते सारखे सांगत होते की मला त्याच दवाखान्यात ठेवा. खाजगी दवाखान्यातलं वातावरण बरं होतं.”

सिव्हिल हॉस्पिटलमधला व्हेंटिलेटर योग्य प्रेशरवर काम करत नव्हता. “त्यांना तोंडाला लावलेला मास्क सारखा खाली पडत होता म्हणून मी रात्रभर तो तसा धरून बसलो होतो. पण त्यांची तब्येत ढासळायला लागली. दुसऱ्या दिवशीच त्यांचा प्राण गेला,” हृषीकेश सांगतात. शिवाजींसोबत आणखी चार रुग्णांना इथे हलवण्यात आलं होतं. तेदेखील मरण पावले.

१२ एप्रिल रोजी जनाबाईंना सुद्धा श्वासाचा त्रास व्हायला लागला म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. त्या १५ एप्रिल रोजी वारल्या. “दोघांची तब्येत चांगली होती,” कापऱ्या आवाजात हृषीकेश सांगतात. “खूप कष्ट करून त्यांना खडतर परिस्थितीत आम्हाला लहानाचं मोठं केलंय.”

उस्मानाबाद शहरातल्या त्यांच्या घरातल्या भिंतीवर काटे कुटुंबियांचा मोठा फोटो चिकटवलेला आहे. हृषीकेश, त्यांचा मोठा भाऊ मंगेश, त्यांच्या पत्नी आणि मुलं असे सगळे शिवाजी आणि जनाबाईंसोबत एकत्रच राहत होते. शहराच्या बाहेर या कुटुंबाची पाच एकर शेती आहे. “ते जातील असं वाटलंच नव्हतं,” ते म्हणतात. “एखादी व्यक्ती जी एकदम निरोगी आहे, तुमच्या डोळ्यासमोर रोज व्यायाम करतीये, अचानक ते या जगात नाहीत हे मान्य करणं शक्यच नाही.”

परळीमध्ये आपल्या घराबाहेर बसलेल्या रंदावनी देखील आपल्या पतीचं जाणं मान्य करण्याचा प्रयत्न करतायत. रोज संध्याकाळी ज्या जागी बसून त्यांचे पती भजनं गायचे तिथेच त्या बसतात आणि ते आता नाहीत हे स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. “मला काही त्यांच्यासारखं गाता येत नाही,” कसनुसं हसून त्या सांगतात. “येत असतं तर बरं होतं.”

अनुवादः मेधा काळे

Parth M.N.

Parth M.N. is a 2017 PARI Fellow and an independent journalist reporting for various news websites. He loves cricket and travelling.

Other stories by Parth M.N.
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale