मागील वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस सांजा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील दोन वर्गांमध्ये २ नवे कोरे एल.ई.डी. टीव्ही बसवण्यात आले. ग्रामपंचायतीने अध्ययन-अध्यापनात मदत व्हावी म्हणून ते वापरायला दिले.
पण, भिंतीवर टांगलेले टीव्ही संच धूळ खात पडले आहेत, बंद. कारण, मार्च २०१७ नंतर, दोन वर्षं झाले तरी, शाळेत वीजच नाहीये.
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातल्या या शाळेच्या मुख्याध्यापिका शीला कुलकर्णी यांची गत हसावं की रडावं अशी झालीये. “शाळेला शासनाकडून मिळणारं अनुदान पुरेसं नाही. आमच्या शाळेतील पटसंख्या लक्षात घेता [दोन वर्गांमध्ये एकूण ४० विद्यार्थी] आम्हाला वर्षाला फक्त १०,००० रुपये मिळतात. त्यात शाळेची देखभाल करायची आणि विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तकं आणायची. वीज पुरवठा सुरू करायचा तर आम्हाला आधी १८,००० रुपये भरावे लागतील.”
२०१२ पासून विजेशिवाय शाळेची अशीच अवस्था आहे. त्यावेळी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाचे एक अधिकारी सांगतात, शासनाने असा शासननिर्णय (जी. आर.) काढला की यंदापासून जिल्हा परिषदेच्या शाळांना घरगुती (रू. ३.३६प्रति युनिट) दराऐवजी व्यावसायिक दराने (रू. ५.८६ प्रति युनिट) वीज पुरवण्यात येईल.
मग काय, शाळांना येणारं विजेचं बिल वाढायला लागलं. २०१५ च्या अखेरपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील १०९४ पैकी ८२२ जि.प. शाळांचा वीज पुरवठा तोडण्यात आला, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते सांगतात. ऑक्टोबर २०१८ पर्यंत थकबाकी रू. १ कोटींच्या वर गेली होती, आणि जिल्ह्यातील ७० टक्क्यांहून जास्त शाळा विजेविना चालत होत्या.










