२२ वर्षांचा गुरप्रीत मेला त्याच्या आदल्या दिवसापर्यंत तो त्याच्या गावात नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करत होता. पंजाबच्या वायव्येला असलेल्या आपल्या गावी त्यांची पाच एकर शेती आहे. त्याच्या वडलांना, जगतार सिंग कटारियांना आपल्या मुलाचं शेवटचं भाषण अजूनही लक्षात आहे. पंधरा एक शेतकरी गोळा झाले होते आणि त्याचं भाषण अतिशय उत्कंठेने ऐकत होते. दिल्लीच्या वेशीवर इतिहास घडत असल्याचं आणि आपण त्यात हातभार लावला पाहिजे असं तो त्यांना सांगत होता. २०२० साली डिसेंबर महिन्यातल्या त्या भाषणानंतर तिथले सगळे बाह्या सावरून दिल्लीला कूच करायला सज्ज झाले होते.

गेल्या वर्षी १४ डिसेंबरला ते पंजाबच्या शहीद भगत सिंग नगर जिल्ह्याच्या बालाचुर तालुक्यातल्या माकोवाल या आपल्या गावाहून निघाले. पण साधारणपणे ३०० किलोमीटरवर हरयाणाच्या अंबाला जिल्ह्यातल्या मोहराजवळ त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला एका अवजड वाहनाची धडक बसली. “खूप जोराची धडक बसली. गुरप्रीत गेला,” जगतार सिंग सांगतात. गुरप्रीत पतियाळाच्या मोदी कॉलेजमध्ये बीए करत होता. “आंदोलनासाठी त्याने काय द्यावं? स्वतःचा जीव.”

२०२० साली सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे सदनात मांडले व पारित केले. या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या ७०० हून अधिक शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. हे कायदे लागू झाले तर किमान हमीभावाची सगळी यंत्रणा कोलमडून पडेल आणि बड्या कंपन्या पिकांचे भाव ठरवू लागतील तसंच बाजारातही त्यांना गैरप्रकारे लाभ मिळेल अशी देशभरातल्या शेतकऱ्यांना खात्री वाटली. त्यानंतरच्या आंदोलनात देशभरातले – खास करुन पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातले शेतकरी २६ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या वेशीवर जमा झाले. दिल्लीत प्रवेश नाकारल्याने त्यांनी दिल्ली-हरयाणा सीमेवर सिंघु आणि टिक्री इथे आणि दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर गाझीपूर इथे तळ ठोकला.

आंदोलनाला जवळ जवळ एक वर्ष पूर्ण होत आलं आणि १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पंतप्रधानांनी हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. कृषी कायदे रद्द करणे विधेयक, २०२१ २९ नोव्हेंबर रोजी संसदेत पारित करण्यात आलं. त्यानंतर शेतकरी संघटनांच्या बहुतेक मागण्या शासनाने मान्य केल्यानंतर ११ डिसेंबर २०२१ रोजी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली.

ज्यांचे जिवलग या वर्षभर चाललेल्या आंदोलनात मरण पावले अशा काही कुटुंबाशी मी प्रत्यक्ष आणि फोनवर संवाद साधला. या आंदोलकांची कुटुंबं उद्ध्वस्त झालीयेत, दुःखी आहेत तशीच संतप्तही. ध्येयासाठी शहीद झालेल्या आपल्या या आप्तांच्या आठवणी त्यांच्या मनात धगधगत आहेत.

“आम्ही शेतकऱ्यांच्या विजयाचा आनंद जरुर साजरा करी. पण पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली तरी आम्ही काही त्यामुळे खूश झालो नाही,” जगतार सिंग कटारिया म्हणतात. “या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही. त्यांनी शेतकऱ्यांचा आणि मृतांचाही केवळ अपमान केला आहे.”

From the left: Gurpreet Singh, from Shahid Bhagat Singh Nagar district, and Ram Singh, from Mansa district, Punjab; Navreet Singh Hundal, from Rampur district, Uttar Pradesh
From the left: Gurpreet Singh, from Shahid Bhagat Singh Nagar district, and Ram Singh, from Mansa district, Punjab; Navreet Singh Hundal, from Rampur district, Uttar Pradesh
From the left: Gurpreet Singh, from Shahid Bhagat Singh Nagar district, and Ram Singh, from Mansa district, Punjab; Navreet Singh Hundal, from Rampur district, Uttar Pradesh

डावीकडूनः गुरप्रीत सिंग, जि. शहीद भगत सिंग नगर, राम सिंग, जि. मनसा, पंजाब, नवरीत सिंग हुंडाल, जि. रामपूर, उत्तर प्रदेश

“आमचे शेतकरी मरतायत. आमच्या सैनिकांनी पंजाबसाठी आणि देशासाठी त्यांचा जीव दिलाय. पण सरकारला या शहीदांविषयी कसलंही सोयरसुतक नाही. मग ते सीमेवरचे असोत, नाही तर देशाच्या आतले. त्यांनी देशाच्या सीमांवर लढणाऱ्या जवानांची आणि आपल्यासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा केली आहे,” ६१ वर्षीय ग्यान सिंग सांगतात. ते पंजाबच्या मनसा जिल्ह्यातल्या बुधलाडा तालुक्याच्या दोडरा गावचे रहिवासी आहेत.

आंदोलन सुरू झालं तेव्हाच्या काळात ग्यान सिंग यांचे बंधू, ५१ वर्षीय राम सिंग मरण पावले. राम सिंग भारतीय किसान युनियन (एकता उग्राहां) या शेतकरी संघटनेचे सदस्य होते. ते मनसा रेल्वे स्थानकाच्या परिसरात आंदोलकांसाठी लाकूडफाटा गोळा करायचे. गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी लाकडाचा एक ओंडका त्यांच्या अंगावर पडला आणि ते मरण पावले. “पाच बरगड्या तुटल्या आणि फुफ्फुसाला इजा झाली,” ग्यान सिंग करड्या आवाजात सांगतात. त्या पाठची वेदना लपवत.

“कृषी कायदे रद्द होणार ही घोषणा झाल्यानंतर आमच्या गावातल्या लोकांनी फटाके फोडले, दिवे लावले,” ग्यान सिंग सांगतात. “आमच्या घरातला एक जण शहीद झाल्याने आम्ही काही हा सोहळा साजरा करू शकलो नाही. पण आम्हालाही आनंद आहे.”

सरकारने हे कायदे फार आधीच मागे घ्यायला पाहिजे होते, ४६ वर्षीय सिरविक्रमजीत सिंग हुंडाल सांगतात. ते उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्याच्या बिलासपूर तालुक्यातल्या डिबडिबा गावचे शेतकरी आहेत. “शेतकऱ्यांबरोबर चर्चेच्या ११ फेऱ्या झाल्यानंतरही त्यांनी हे पाऊल उचललं नाही.” २६ जानेवारी २०२१ रोजी त्यांचा मुलगा, २५ वर्षीय नवरीत सिंग हुंडाल दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये मरण पावला. दीन दयाल उपाध्याय मार्गावर दिल्ली पोलिसांनी अडथळे उभे केले होते. त्याला धडकून नवरीतचा ट्रॅक्टर पलटी झाली. त्या आधी त्याला गोळी घालण्यात आली होती, नवरीतचे वडील म्हणतात. त्यांचा रोख पोलिसांकडे आहे. पण तेव्हा दिल्ली पोलिसांनी मात्र त्याचा मृत्यू ट्रॅक्टर पलटी झाल्याने नवरीत जखमी झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं होतं. “चौकशी अजून सुरूच आहे,” सिरविक्रमजीत सांगतात.

“तो गेल्यापासून सगळंच उलटंपालटं झाल्यासारखं वाटतं,” ते पुढे म्हणतात. “कायदे मागे घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या जखमांवर काही फुंकर घातलेली नाही. फक्त आपली खुर्ची टिकवण्याची चाल आहे,” ते म्हणतात. “आमच्या भावनांशी खेळ चालवलाय त्यांनी.”

शेतकऱ्यांप्रती सरकारचा दृष्टीकोन – मग ते जिवंत असोत किंवा मेलेले – वाईटच आहे, ४० वर्षीय जगजीत सिंग सांगतात. ते उत्तर प्रदेशातल्या बहराइच जिल्ह्याच्या बलाहा तालुक्यातल्या भतेहता गावचे रहिवासी आहेत. “आम्ही हे सरकार निवडून आणलं. आणि आज तेच आम्हाला ‘खलिस्तानी’, ‘देशद्रोही’ म्हणतंय आणि आम्हाला चिरडून टाकतंय. त्यांची हिंमत तरी कशी होते?” ते विचारतात. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तर प्रदेशातल्. लखीमपूर खेरी मध्ये एका हल्ल्यामध्ये जगजीत यांचा भाऊ दलजीत मारला गेला. सप्टेंबर महिन्यात आपल्या भाषणात शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या अजय कुमार टेनीच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी शेतकरी लखीमपूर खेरीत जमले होते.

From the left: Daljeet Singh, from Bahraich district, and Lovepreet Singh Dhillon, from Kheri district, Uttar Pradesh; Surender Singh, from Shahid Bhagat Singh Nagar district, Punjab
From the left: Daljeet Singh, from Bahraich district, and Lovepreet Singh Dhillon, from Kheri district, Uttar Pradesh; Surender Singh, from Shahid Bhagat Singh Nagar district, Punjab
From the left: Daljeet Singh, from Bahraich district, and Lovepreet Singh Dhillon, from Kheri district, Uttar Pradesh; Surender Singh, from Shahid Bhagat Singh Nagar district, Punjab

डावीकडूनः उत्तर प्रदेशातले दलजीत सिंग, जि. बहराइच, लवप्रीत सिंग धिल्लों, जि. खेरी, पंजाबचे सुरेंदर सिंग, जि. शहीद भगत सिंग नगर

मंत्र्यांच्या ताफ्यातली तीन वाहनं शेतकऱ्यांना चिरडून गेली आणि त्यामध्ये चार शेतकरी आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला. यानंतर हिंसाचार उसळला. टेनीचा मुलगा आशीष मिश्रा याचं नाव १३ आरोपींमध्ये समाविष्ट आहे. या प्रकाराची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने हा सगळा प्रकार ‘पूर्वनियोजित कट’ असल्याचं म्हटलं आहे.

३५ वर्षीय दलजित यांना दोन एसयूव्ही गाड्यांनी धडक दिली आणि तिसरी गाडी त्यांच्या अंगावरून गेली. “आमच्या मुलाने, १६ वर्षांच्या राजदीपने ती सगळी घटना स्वतःच्या डोळ्याने पाहिली आहे,” दलजित यांच्या पत्नी परमजीत कौर सांगतात. “त्या दिवशी आंदोलनासाठी निघण्याआधी ते हसत होते, हात हलवून आमचा निरोप घेत होते. हा सगळा प्रकार होण्याच्या अगदी १५ मिनिटं आधी माझं त्यांच्याशी फोनवर बोलणंही झालं होतं. ते म्हणाले होते, ‘इथे भरपूर लोक आहेत. मी लवकरच येतोय’.” पण ते काही होणं नव्हतं.

जेव्हा कृषी कायदे रद्द करत असल्याचं जाहीर करण्यात आलं तेव्हा आमच्या घरी दुःखाचं वातावरण होतं. “त्या दिवशी आमच्या कुटुंबाने पुन्हा एकदा दलजीतच्या जाण्याचं दुःख भोगलं,” जगजीत सांगतात. “कायदे रद्द केलेल तरी माझा भाऊ काही परत येणार नाहीये. आंदोलनात शहीद झालेले ७०० लोक त्यांच्या आप्तांना परत मिळणार नाहीयेत.”

लखीमपूर खेरीत ज्या एसयूव्ही गाडीने आंदोलकांना चिरडलं ती गर्दीमध्ये सावकाश जात होती आणि जिथे लोक जरा विरळ होते तिथे वेगाने चालली होती, ४५ वर्षीय सतनाम धिल्लों सांगतात. त्यांचा मुलगा, १९ वर्षीय लवप्रीत सिंग धिल्लों त्यात मारला गेला. “ते लोकांना मागून धडका देत होते आणि चिरडत पुढे चालले होते,” सतनाम सांगतात. ते उत्तर प्रदेशच्या खेरी जिल्ह्याच्या पलिया तेहसीलमधल्या भगवंत नगर गावी राहतात. हा प्रकार घडला तेव्हा ते स्वतः आंदोलनस्थळी नव्हते पण ते लागलीच तिथे पोचले तेव्हा कुणी तरी त्यांना काय कसं झालं ते सांगितलं होतं.

लवप्रीतची आई, ४२ वर्षीय सतविंदर कौर अजूनही रात्री अपरात्री झोपेतून उठते आणि आपल्या मुलाच्या आठवणीत रडत राहते, सतनाम सांगतात. “मंत्र्याने राजीनामा द्यावा आणि त्याच्या मुलाला शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. बाकी काही नाही.”

“आम्हाला न्याय मिळावा यासाठी सरकार काहीही करत नाहीये,” खेरीच्या धौराहाराचा जगदीप सिंग सांगतो. त्याचे वडील ५८ वर्षीय नचट्टर सिंग लखीमपूर खेरीच्या हिंसाचारात मारले गेले. त्या सगळ्या प्रकाराबद्दल बोलाल का असं विचारल्यावर संतापलेला जगदीप सिंग म्हणतो, “आमच्यावर काय प्रसंग ओढवला हे विचारणं खरंच योग्य नाहीये. हे म्हणजे भुकेलेल्याचे हात पाठी बांधून त्याच्यासमोर अन्न ठेवावं आणि त्याला विचारावं, ‘अन्न कसं आहे’ अशी गत झाली. यापेक्षा आमची न्यायासाठीची लढाई कुठपर्यंत पोचलीये, ते मला विचारा. या सरकारबद्दल आमचं गाऱ्हाणं काय आहे? शेतकऱ्यांना असं का चिरडलं जातंय? ते विचारा.”

From the left: Harbansh Singh and Pal Singh, from Patiala district, and Ravinder Pal, from Ludhiana district, Punjab
From the left: Harbansh Singh and Pal Singh, from Patiala district, and Ravinder Pal, from Ludhiana district, Punjab
From the left: Harbansh Singh and Pal Singh, from Patiala district, and Ravinder Pal, from Ludhiana district, Punjab

डावीकडूनः हरबंश सिंग आणि पाल सिंग, जि. पतियाळा आणि रविंदर पाल, जि. लुधियाना, पंजाब

जगदीप पेशाने डॉक्टर आहे आणि त्याचा धाकटा भाऊ देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सशस्त्र सीमा दलात काम करतो. “आम्ही देशाची सेवा करतोय,” जगदीप संतापून म्हणतो. “स्वतःचा बाप गेला की कसं वाटतं ते एखाद्या मुलालाच विचारा.”

मनप्रीत सिंग याचे वडील ६४ वर्षीय सुरेंदर सिंग यांचा ४ डिसेंबर २०२१ रोजी अपघातात मृत्यू झाला. ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी शहीद भगत सिंग नगर जिल्ह्याच्या बालाचुर तालुक्यातल्या हासनपुर खुर्द या आपल्या गावाहून दिल्लीच्या दिशेने निघाले होते. हरयाणाच्या सोनिपतमध्ये अपघात झाला. “खूप, खरंच खूप वाईट वाटतं. पण दुसरीकडे त्यांचा अभिमानही आहे. त्यांनी या चळवळीसाठी आपला जीव दिला. शहीद झाले ते,” २९ वर्षांचा मनप्रीत सांगतो. “सोनिपतमधल्या पोलिस अधिकाऱ्यांनी वडलांचं पार्थिव इथे आणण्यासाठी मदत देखील केली.”

७३ वर्षीय हरबंश सिंग कृषी कायद्यांच्या विरोधात फार सुरुवातीपासून आंदोलन करत होते. हे आंदोलन दिल्लीच्या वेशीवर तळ ठोकून बसलं, त्या आधीपासून. ते भारतीय किसान युनियन (सिधुपुर) या संघटनेचे सदस्य असून पतियाळा तालुक्यातल्या मेमूदपूर जट्टा या गावी बैठका घ्यायचे. गेल्या वर्षी १७ ऑक्टोबर रोजी ते भाषण देत असतानाच खाली कोसळले. “हे कायदे काय आहेत हे लोकांना समजावून सांगत असतानाच ते खाली कोसळले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला,” त्यांचा मुलगा २९ वर्षीय जगतार सिंग सांगतो.

“ज्यांना मृत्यू आला त्यांना आपला जीव गमवावा लागला नसता तर आज आम्ही खूश असतो,” जगतार सिंग सांगतो.

५८ वर्षीय पाल सिंग पतियाळाच्या नबहा तालुक्यातले शेतकरी. गावात त्यांची १.५ एकर शेती आहे. ते दिल्लीच्या आंदोलनासाठी निघाले तेव्हा त्यांनी घरच्यांना कल्पना दिलीच होती, “मी जिवंत परत येईन अशी आशा मनाशी ठेवू नका,” त्यांची सून, अमनदीप कौर सांगते. ते सिंघुमध्ये १५ डिसेंबर २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे मरण पावले. “जे गेले त्यांना कुणीच परत आणू शकत नाही,” ३१ वर्षीय अमनदीप म्हणते. तिने कॉलेजमध्ये ग्रंथालयशास्त्र विषयात शिक्षण घेतलं आहे. “ज्या दिवशी हे शेतकरी दिल्लीला पोचले त्याच दिवशी कायदे मागे घ्यायला पाहिजे होते. उलट शेतकऱ्यांना थोपवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करण्यात आले. त्यांनी अडथळे उभे केले, रस्त्यात खंदक खोदले.”

चार जणांच्या कुटुंबातले पाल सिंग हे मुख्य कमावते सदस्य होते. आधीच या कुटुंबावर कर्जाचा बोजा आहे. अमनदीप शिलाईचं काम करते, तिचा नवरा, पाल सिंग यांचा मुलगा काहीच काम करत नाही आणि सासू घर सांभाळते. “त्यांचा मृत्यू झाला ना, त्याच्या आदल्या दिवशी पायात जोडे घालूनच ते झोपी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघून ते घरी येणार होते,” अमनदीप सांगते. “घरी त्यांचा देह आला, ते नाहीत.”

From the left: Malkit Kaur, from Mansa district, Punjab; Raman Kashyap, from Kheri district, UP; Gurjinder Singh, from Hoshiarpur district, Punjab
From the left: Malkit Kaur, from Mansa district, Punjab; Raman Kashyap, from Kheri district, UP; Gurjinder Singh, from Hoshiarpur district, Punjab
From the left: Malkit Kaur, from Mansa district, Punjab; Raman Kashyap, from Kheri district, UP; Gurjinder Singh, from Hoshiarpur district, Punjab

डावीकडूनः मलकित कौर, जि. मनसा, पंजाब, रमण कश्यप, जि. खेरी, उत्तर प्रदेश, गुरजिंदर सिंग, जि. होशियारपूर, पंजाब

६७ वर्षीय रविंदर पाल सिंग पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातल्या खन्ना तालुक्याच्या इकोलाहा गावचे रहिवासी होते. त्यांनी हॉस्पिटलमध्ये प्राण सोडला. ३ डिसेंबर रोजी सिंघु सीमेवर क्रांतीची गाणी गात असलेला एक व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला. त्यांनी एक पांढरा शुभ्र कुडता परिधान केला होता. त्याच्यावर लाल शाईमध्ये ‘परणाम शहीदों को’ आणि ‘ना पगडी ना टॉप, भगत सिंग एक सोच’ अशा घोषणा लिहिलेल्या होत्या.

पण त्याच दिवशी दुपारनंतर रविंदर यांची तब्येत बिघडली. त्यांना ५ डिसेंबर रोजी लुधियानाला हलवण्यात आलं. दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं. “त्यांनी इतरांना झोपेतून जागं केलं आणि आता स्वतः चिरनिद्रेत गेले आहेत,” त्यांचे पुत्र, ४२ वर्षीय राजेश कुमार सांगतात. २०१०-२०१२ या दरम्यान त्यांनी भुतानच्या शाही सैनिकांना प्रशिक्षण दिलं आहे. या कुटुंबाची स्वतःची जमीन नाही. “माझे वडील शेतमजूर संघटनेचे सदस्य होते आणि त्यांच्यामध्ये एकजुटीसाठी ते काम करायचे,” राजेश सांगतात.

पंजाबच्या मनसा जिल्ह्यात मझदूर मुक्ती मोर्चाच्या सदस्य असणाऱ्या ६० वर्षीय मलकित कौर कामगारांच्या हक्कांसाठी लढत होत्या. त्या दलित होत्या आणि त्यांची स्वतःची जमीन नव्हती. गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी त्या १,५०० शेतकऱ्यांच्या गटाबरोबर दिल्लीला निघाल्या होत्या. “सगळा गट हरयाणाच्या फतेहाबादमध्ये लंगरसाठी थांबला. रस्ता ओलांडत असताना एका वाहनाची धडक बसून त्या गेल्या,” कामगार संघटनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख गुरजंत सिंग सांगतात.

३ ऑक्टोबर २०२१ रोजी लखीमपूर खेरीच्या हल्ल्यात मरण पावलेले ३४ वर्षीय रमण कश्यप पत्रकार होते. साधना प्लस या टीव्ही वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या कश्यप यांना दोन मुलं आहेत आणि ते खेरीच्या निघासन तालुक्याचे रहिवासी होते. “त्याला समाजसेवेची कायमच आवड होती,” त्यांचे बंधू, पवन कश्यप सांगतात. ते शेती करतात. ते, रमण आणि त्यांचा तिसरा भाऊ अशी तिघांची मिळून चार एकर शेती आहे. “ते गाडीच्या चाकाखाली आले आणि रस्त्यावर पडले. तीन तास त्यांच्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. त्यांचा मृतदेह थेट शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला,” ३२ वर्षीय पवन सांगतात. भावांची सगळी शेती तेच करतात. “मी शवागारात त्याला पाहिलं. त्याच्या अंगावर टायरच्या आणि खालच्या खडीच्या खुणा होत्या. त्याला वेळेवर उपचार मिळाले असते तर तो वाचू शकला असता.”

पोटची मुलं अशा रितीने गमावणं घरच्यांसाठी फार कष्टाचं आहे. पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातल्या गढशंकर तालुक्याच्या तांडा गावातला गुरजिंदर सिंग केवळ १६ वर्षांचा होता. “आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. हे असले बेकार कायदे सरकारने आणले तरी कशासाठी?” त्याची आई, ३८ वर्षीय कुलविंदर कौर विचारतात. गुरजिंदर दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाला होता. १६ डिसेंबर २०२० रोजी करनालजवळ तो ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरून खाली पडला आणि मरण पावला. या घटनेच्या दहाच दिवस आधी, ६ डिसेंबर रोजी १८ वर्षांचा जसप्रीत सिंग हरयाणाच्या कैथाल जिल्ह्याच्या गुहला तालुक्यातल्या मस्तगढ या आपल्या गावाहून सिंघुला जायला निघाला होता. तो ज्या वाहनाने निघाला होता ते रस्त्यात एका कालव्यात पडलं आणि त्यात जसप्रीत मरण पावला. जसप्रीतचे काका, ५० वर्षीय प्रेम सिंग सांगतात, “ज्या लोकांनी आपले जिवगल गमावले, त्यांना आता हे कायदे मागे घेतले काय किंवा नाही, काय फरक पडणारे?”

जे आंदोलक मरण पावले त्यांच्या कुटुंबांशी बोलताना रस्त्यावरचे अपघात, मानसिक ताण-तणाव आणि दिल्लीच्या थंडीवाऱ्याचा मुकबला करताना झालेला शारीरिक त्रास अशी काही कारणं पुढे आली. कृषी कायद्यांनी निर्माण झालेल्या यातना आणि पुढे आलेली अनिश्चितता, त्याच सोबत शेतकऱ्यांनी अनुभवलेली अनास्था या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आत्महत्या आणि मृत्यू.

From the left: Jaspreet Singh, from Kaithal district, Haryana; Gurpreet Singh, from Fatehgarh Sahib district, Punjab; Kashmir Singh, from Rampur district, UP
From the left: Jaspreet Singh, from Kaithal district, Haryana; Gurpreet Singh, from Fatehgarh Sahib district, Punjab; Kashmir Singh, from Rampur district, UP
From the left: Jaspreet Singh, from Kaithal district, Haryana; Gurpreet Singh, from Fatehgarh Sahib district, Punjab; Kashmir Singh, from Rampur district, UP

डावीकडूनः जसप्रीत सिंग, जि. कैथाल हरयाणा, गुरप्रीत सिंग, जि. फतेहगढ साहिब, पंजाब, कश्मीर सिंग, जि. रामपूर, उत्तर प्रदेश

१० नोव्हेंबर २०२१ रोजी सिंघुच्या आंदोलन स्थळाजवळ असलेल्या एका ढाब्यासमोर ४५ वर्षीय गुरप्रीत सिंग फासाला लटकलेले सगळ्यांना दिसले. त्यांच्या डाव्या हातावर केवळ एक शब्द लिहिलेला होता – झिम्मेदार (जबाबदार), त्यांचा मुलगा, २१ वर्षीय लवप्रीत सांगतो. पंजाबच्या फतेहगढ जिल्ह्याच्या अमलोह तालुक्यात, रुडकी गावामध्ये गुरप्रीत यांच्या मालकीची अर्धा एकर जमीन आहे. घरच्या जनावरांसाठी या जमिनीत चारा पिकवला जातो. घरापासून १८ किलोमीटरवर मंडी गोबिंदगढमध्ये ते शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करायचे आणि त्यावरच त्यांचं पोट अवलंबून होतं.

कश्मीर सिंग यांचा जन्म झाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी. इंग्रज राजवटीचं जोखड भारताने फेकून दिलं त्या दिवशी. उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्याच्या सुआर तालुक्यातल्या पसियापूर गावात त्यांची शेती आहे. गाझीपूरच्या सामुदायिक स्वयंपाकघरात कश्मीर सिंग काम करत होते. पण २ जानेवारी २०२१ रोजी त्यांनी फास लावून घेतला. त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होतीः “कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी मी माझ्या देहाचं बलिदान देत आहे.”

“या ७०० शहीदांच्या कुटुंबांना आज काय वाटत असेल?” कश्मीर सिंग यांचा नातू गुरविंदर सिंग विचारतो. “कायदे जरी मागे घेतले असले तरी आमचे ७०० शेतकरी काही परत येणार नाहीयेत. या ७०० घरांमध्ये आज अंधार झालाय.”

दिल्लीच्या वेशीवरची आंदोलन स्थळं आता रिकामी झाली आहेत. पण आजही शेतमालाला किमान हमीभाव मिळण्याची कायदेशीर तरतूद आणि शहीद आंदोलकांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई या दोन मुद्द्यांसाठी शेतकरी संघर्ष करत आहेत. पण १ डिसेंबर २०२१ रोजी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर मात्र स्पष्टपणे म्हणाले आहेत की अशा मृत्यूंची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसल्याने नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही.

सरकारने लक्ष दिलं असतं तर त्यांना समजलं असतं ना किती लोक गेले ते, गुरविंदर म्हणतो. “इथे शेतकरी महामार्गांवर बसून होते पण सत्ताधारी मात्र आपल्या आलिशान महालांमध्ये आराम करत होते.” तंत्रज्ञान आणि विदा मिळणं इतकं सोपं असताना, “आंदोलनादरम्यान मरण पावलेल्यांची माहिती मिळवणं अशक्य होतं का?” मझदूर किसान मोर्चाचे गुरजंत सिंग विचारतात.

गुरप्रीत सिंग पुन्हा काही भाषण देऊ शकणार नाही. तो आणि त्याच्यासारखे ७०० शेतकरी दिल्लीच्या वेशीवर लिहिल्या गेलेल्या इतिहासाचे साक्षीदार होऊ शकले नाहीत. आपल्या समपथिक आंदोलकांबरोबर विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी किंवा त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी आज त्यांच्यापैकी कुणीच इथे नाहीत. पण कदाचित धरतीवरच्या शेतकऱ्यांची मानवंदना स्वीकारत ते वरती आभाळातून विजयाची पताका फडकवत असतील. कोण जाणे.

सर्व छायाचित्रे शहीद आंदोलकांच्या कुटुंबियांनी दिली आहेत. शीर्षक छायाचित्रः आमिर मलिक.

जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील किंवा तुमच्या ओळखीचं कुणी तणावाखाली असेल तर किरण या राष्ट्रीय हेल्पलाइन शी संपर्क साधा – १८००-५९९-००१९ (२४ तास, टोल फ्री) किंवा तुमच्या जवळच्या यापैकी कोणत्याही हेल्पलाइनशी संपर्क साधा. मानसिक आरोग्यासाठी सेवा आणि सेवादात्यांची माहिती हवी असल्यास, एसपीआयएफ ने तयार केलेल्या या सूचीची अवश्य मदत घ्या.

Amir Malik

Amir Malik is an independent journalist, and a 2022 PARI Fellow.

Other stories by Amir Malik
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale