“तू इतकी वर्षं माझे फोटो काढतोयस. त्याचं नक्की काय करणारेस?” गोविंदम्मा वेलु मला विचारते आणि रडू लागते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तिचा मुलगा सेल्लय्या मरण पावला तेव्हापासून ती अगदी कोलमडून गेलीये. “आता माझी दृष्टी पार गेलीये. तूसुद्धा नीट दिसत नाहीयेस. माझ्याकडे आणि माझ्या म्हाताऱ्या आईकडे आता कोण बघेल रे?”
हाताला कसं कापलंय, लागलंय ते ती मला दाखवते. “घरी २०० रुपये न्यायचे तर मला इतकं काय काय सहन करावं लागतं. जाळं टाकून कोळंबी पकडायचं माझं काय वय आहे का? नाही जमत. आता फक्त हाताने धरता येईल तेवढी धरायची,” गोविंदम्मा सांगते. सत्तरी पार केलेल्या, लहानखुऱ्या, अगदी किरकोळ ठेवणीच्या गोविंदम्माला वाटतं की ती ७७ वर्षांची आहे. “लोकच मला तसं सांगतात,” ती म्हणते. “रेतीत हात घालायचा आणि कोळंबी धरायची तर हाताला खोल जखमा होतात. पाण्यात हात असले की रक्त यायला लागलं तरी समजत नाही.”
२०१९ साली मी बकिंगहॅम कनालमधून प्रवास करत चाललो होतो तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं. एन्नोर या उत्तर चैन्नईच्या परिसरात कोसस्तलैयार नदीला समांतर असा हा कालवा वाहतो आणि शेजारच्या तिरुवल्लुर जिल्ह्यापर्यंत जातो. एखाद्या बदकासारखी ती चपळपणे कालव्याच्या पाण्यात डुबकी लगावत होती आणि पाण्याखाली राहत होती. त्यानेच खरं तर माझं लक्ष वेधलं गेलं. पाण्याच्या तळाशी असलेल्या खरबरीत रेतीत हात घालून ती इतरांपेक्षा जास्त चपळाईने कोळंबी पकडत होती. कंबरेइतक्या पाण्यात उभी असलेली, कंबरेला बांधलेल्या झापाच्या एका पिशवीत कोळंबी टाकत असलेल्या गोविंदम्माची त्वचा त्या कालव्याच्या पाण्याशी तद्रुप झाली होती. दोन्ही रंग वेगळे करणं केवळ अशक्य.
एकोणिसाव्या शतकात बांधलेला हा बकिंगहॅम कालवा, कोसस्तलैयार आणि अरणियार या दोन नद्या मिळून तयार झालेली जलसंस्था चेन्नईसाठी ‘जीवन’दायी ठरली आहे.

















