हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.
“सकाळचे ११.४० वाजून गेलेत, आणि आता वार्ता वाऱ्यांची,” कादल ओसई रेडिओ केंद्रावर ए. यशवंत घोषणा करतो. “गेल्या आठवड्यापासून, खरं तर महिन्यापासून कचान कातू [दक्षिणेकडचे वारे] वेगात वाहत होते. त्यांचा वेग [ताशी] ४०-६० [किमी] होता. आज, जणू काही मच्छिमारांच्या मदतीसाठी म्हणून तो मंदावून १५ [किमी, ताशी] झाला आहे.”
तमिळ नाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातल्या पाम्बन बेटावरच्या मच्छिमारांसाठी ही सुवार्ताच होती. “म्हणजे आता आम्ही बिनधास्त समुद्रात जाऊ शकतो, भीतीचं कारण नाही,” यशवंत म्हणतो. तो स्वतः मच्छिमार आहे. तो कादल ओसई (समुद्राची गाज) या कम्युनिटी रेडिओवर रेडिओ जॉकी आहे.
रक्तदानावरच्या एका खास कार्यक्रमाआधी यशवंत हवामानाचा अहवाल सांगतो, आणि शेवटचा संदेशः “तापमान ३२ अंश सेल्सियस आहे. त्यामुळे भरपूर द्रव पदार्थ घ्या, उन्हात जाऊ नका.”
आणि हा इशारा गरजेचा आहे कारण पाम्बनमध्ये आता उष्ण दिवसांची संख्या वाढत चाललीये. यशवंत जन्मला तेव्हा, १९९६ मध्ये या बेटावर ३२ अंशापेक्षा जास्त तापमान असणारे १६२ दिवस असायचे. त्याचे वडील, अँथनी सामी जन्मले तेव्हा, १९७३ मध्ये हाच आकडा १२५ इतका होता. आणि आज अशा उष्ण दिवसांची संख्या वर्षाकाठी १८० पर्यंत पोचली आहे. जुलै महिन्यात न्यू यॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वातावरण बदल व जागतिक तापमान वाढीसंदर्भातील एका संवादी पोर्टलवरती ही आकडेवारी मिळते.
त्यामुळेच यशवंत आणि त्याचे सहकारी आता फक्त हवामान नाही तर व्यापक पातळीवर वातावरणाचे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. त्याचे वडील, मच्छिमार सवंगडी आणि पाम्बन आणि रामेश्वरम या दोन मुख्य बेटांवरचे सुमारे ८३,००० मच्छिमार आता या बदलांचा अर्थ लावण्यासाठी त्यांच्याकडे कान लावून बसलेत.









