हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.
“आजकाल आमच्या लोकांना झोमो (Dzomo) फार आवडायला लागलेत,” वेस्ट कामेंग जिल्ह्याच्या लागाम गावातली भटकी पशुपालक ३५ वर्षीय पेम्पा त्सुरिंग सांगते.
झोमो? हे काय असतं? आणि अरुणाचल प्रदेशाच्या पर्वतराजींमध्ये ९,००० फुटावर हे का बरं लोकप्रिय होऊ लागले आहेत?
याक आणि खास करून डोंगररांगांमध्ये आढळणाऱ्या कोट या गुराच्या संकरातून तयार झालेली प्रजात म्हणजे झोमो. नर, ज्याला झो (Dzo) म्हणतात, तो नपुंसक असतो त्यामुळे गुराख्यांची पसंती माद्यांना झोमोंना असते. आता हे काही नवीन प्राणी नाहीत, मात्र या हंगामी भटकंती करणाऱ्या समुदायाने आपल्या कळपांमध्ये या प्राण्यांची संख्या आता वाढवायला सुरुवात केली आहे – पूर्व हिमालयात होत असलेल्या वातावरणातल्या बदलांचा मुकाबला करण्यासाठी.
पेम्पांच्या कळपात ४५ गुरं आहेत आणि यात याक आणि झोमो दोन्ही आहेत. ती म्हणते की याक आणि गुरांच्या संकरातून तयार झालेले हे प्राणी “जास्त उष्णता सहन करू शकतात आणि कमी उंचीवर आणि वाढत्या तापमानाशी जास्त सहज जुळवून घेतात.”
उंचावरच्या या कुरणांमध्ये, उष्णता किंवा ‘उकाडा’ हे दोन्ही एकीकडे वास्तव आणि दुसरीकडे सापेक्ष आहेत. इथे काही वर्षभरात पारा ३२ अंशावर जाईल असे दिवस नाहीत. पण उणे ३५ अंश तापमानही सहज सहन करू शकणाऱ्या याकला तापमान १२-१३ अंशाच्या वर गेलं तर मात्र त्रास व्हायला लागतो. आणि खरंच, असे बदल झाले की संपूर्ण परिसंस्थेसमोरच संकट उभं राहतं. आणि गेल्या काही काळात पर्वतांमध्ये हे बदल घडू लागले आहेत.
मोन्पा जमातीची पोट जमात असणारे ब्रोकपा हे भटके पशुपालक (अरुणाचलमध्ये सुमारे ६०,०००, जनगणना, २०११) शतकानुशतकं पर्वतांमधल्या उंचावरच्या कुरणांमध्ये याक पाळतायत. कडक हिवाळ्यात ते खालच्या भागात राहतात आणि उन्हाळ्यात उंचावरच्या प्रदेशात जातात – ९,००० ते १५,००० फूट असा त्यांचा प्रवास सुरू असतो.
पण लडाखच्या चांगथांगमधल्या चांगपांप्रमाणे ब्रोकपांनाही आता दिवसेंदिवस अधिकच लहरी बनत चाललेल्या वातावरणाचा फटका बसू लागला आहे. अनेक शतकांपासून याक, गुरं, शेळ्या आणि मेंढ्या पाळणं हीच त्यांची उपजीविका आणि खरं तर त्यांच्या समुदायांचा आधार आहे. यातही ते सर्वात जास्त याकवर निर्भर असतात – आर्थिक, सामाजिक आणि अगदी अध्यात्मिक पातळीवरही. आता मात्र तो बंध फार नाजूक होऊ लागला आहे.
“अगदी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच याक थकायला लागले आहेत,” चांदर गावच्या पशुपालक लेकी सुझुक मला सांगतात. मे महिन्यात वेस्ट कामेंगच्या दिरांग तालुक्यात फिरत असता मी त्यांच्या घरी राहिलो होतो. “गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळा लांबायला लागलाय, तापमान वाढतंय. याक क्षीण झालेत,” पन्नाशीला टेकलेल्या लेकी सांगतात.


