“ही सगळी [वन खात्याने केलेली] सागाची लागवड पाहिली ना की मला भीतीच वाटू लागते, आमची लेकरं हीच झाडं पाहत लहानाची मोठी होणार बहुतेक. आमच्याकडचं जंगलाचं, झाडांचं, वनस्पती आणि प्राण्यांचं ज्ञान त्यांना मिळणारच नाही,” मध्य प्रदेशातल्या उमरवाडा गावच्या लाइचीबाई उइके सांगतात.
इंग्रज राजवटीने १८६४ साली निर्माण केलेल्या भारताच्या वन खात्याकडे आजही देशातली सर्वात जास्त जमिनीची मालकी आहे. गेल्या एका शतकापासून, या खात्याच्या कायद्यांचा वापर करून, वनसंवर्धन किंवा व्यापाराच्या नावाखाली (जसं की सागाची विक्री) जंगलांना कुंपणं घातली गेली आहेत, आदिवासी आणि वनात राहणाऱ्या समुदायांना गुन्हेगार ठरवून पूर्वापारपासून त्यांच्या असणाऱ्या भूमीतून त्यांनाच हाकलून लावण्यात आलं आहे.
हा “ऐतिहासिक अन्याय” दूर करण्यासाठी वन हक्क कायदा, २००६ सारखा सुधारणावादी कायदा आणला गेला ज्याद्वारे वनांमध्ये अधिवास असणाऱ्या समुदायांना (म्हणजे १५ कोटींहून जास्त भारतीयांना) जमिनीचे अधिकार आणि वनांचं व्यवस्थापन आणि संवर्धन करण्याचा हक्क देण्यात आला. मात्र या कायद्याच्या अशा तरतुदींची योग्य अंमलबजावणीच झालेली दिसत नाही.










