त्यांना आणखी एक धक्का बसला. त्यांच्या लक्षात आलं की या नोटांचे क्रमांक ओळीत होते – जणू काही त्या आताच बँकेतून काढल्या असाव्यात. मग त्यांनी असा निष्कर्ष काढला की दडवून ठेवलेला, न वापरलेला पैसा आता बाहेर निघाला असणार. ताडीमर्री मंडळातल्या ११ गावातल्या शेतकऱ्यांकडून पिकं विकत घेण्यासाठी अनंतपूर किंवा आसपासच्या जिल्ह्यातल्या किंवा तमिळ नाडूच्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाचा वापर होत असणार असा त्यांना संशय आहे. ताडीमर्रीची लोकसंख्या ३२,३८५ आहे, हे पूर्णपणे ग्रामीण मंडळ आहे आणि साक्षरतेची पातळी बरीच कमी आहे.
उमेशसारख्या काहींचा अपवाद वगळता ताडीमर्रीतल्या बहुतेकांना नोटाबंदीचा फटका बसला आहे. उमेश जुन्या नोटा स्वीकारतायत (आणि त्याचं वैध उत्पन्न म्हणून त्यांच्या बँक खात्यात जमा करतायत) म्हणून इथले शेतकरी त्यांच्याकडची खताची उसनवारी पटापट फेडून टाकतायत.
दरम्यान, खताच्या दुकानापासून हाकेच्या अंतरावर असलेली ताडीमर्रीतली दारूच्या दुकानांचा धंदाही तेजीत आहे – कारण ही दुकानंदेखील, अधिकृत असोत किंवा अनधिकृत, जुन्या नोटा स्वीकारतायत.
“हे बघा, आम्हाला पन्नासाची नोट परत मिळालीये,” नशेत असलेले चिना गंगम्मा आम्हाला नोट दाखवतात. आताच त्यांनी – इतर ८ बेरोजगार शेतमजुरांमध्ये मिळून - दारू विकत घेण्यासाठी त्यांच्याकडची १००० ची नोट मोडलीये. पाचशे रुपयाची नोट वापरायची असेल तर किमान ४०० रुपयाची दारू विकत घ्यायलाच लागते.
ताडीमर्रीतल्या अनेकांसाठी जुन्या नोटा बदलण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे चक्क दारू विकत घ्यायची. “मी रोज [काम संपल्यानंतर] एक क्वार्टर प्यायचो,” शेतात नांगरटीसाठी ट्रॅक्टर चालवणारे नागभूषणम सांगतात. इथे देशी दारुची एक क्वार्टर रु. ६०-८० ला मिळते. नागभूषणम सध्या त्यांच्या रोजच्या कोट्यापेक्षा चार-पाच पट जास्त पितायत. त्यांना रोज ५०० रुपये रोजगार मिळतो – पण सध्या त्यांना काम नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडची सगळी कमाई जुन्या नोटांमध्ये आहे. आणि ती ते या दारूच्या दुकानात खर्च करतात.
नागभूषणम यांच्याप्रमाणेच ताडीमर्रीतल्या शेतमजुरांना सध्या काम मिळणं मुश्किल झालं आहे. अनंतपूर जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यामुळे भुईमुगाचं पीक फारसं आलेलं नाही. अनेक शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत आणि शेतमजुरांचे कामाचे दिवसही कमी झाले आहेत.
ताडीमर्री मंडळातले शेतकरी दिवाळीनंतर, नोव्हेंबरच्या सुमारास भुईमुगाची काढणी करतात आणि डिसेंबरपर्यंत विक्री करतात. शेतात मजुरी करणाऱ्यांना रोज किंवा आठवड्याला मजुरी देण्याची पद्धत इथे नाही. शेतमजुरांचा पगार पिकाची काढणी झाल्यानंतरच दिला जातो. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम हाती लागते.
याच काळात शेतकरी एकमेकांकडून २ टक्के महिना व्याजाने घेतलेले हातउसने पैसेदेखील फेडत असतात. “आता जर का आम्ही पैसे परत केले नाहीत तर त्याच्यावरचं व्याज वाढत जाणार,” टी ब्रह्मानंद रेड्डी सांगतात. ते शेतकरी आहेत आणि त्यांची ताडीमर्रीत १६ एकर जमीन आहे.
रेड्डींनी त्यांचा भुईमूग नोटाबंदीनंतर एका आठवड्यानी विकला आणि त्यांना इतर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमध्ये पैसे दिले. त्यांनी हे पैसे त्यांच्या खात्यातही भरले पण आता मजुरांना द्यायला आणि कर्जं फेडण्यासाठी त्यांना नव्या नोटांमध्ये मोठी रक्कम लागणार आहे – आणि आता ताडीमर्री मंडळातल्या तीनही बँकांमध्ये नव्या नोटांचा तुटवडा आहे.