‘‘तीन आणि दोन किती?’’ प्रतिभा हिलीम मुलांना विचारतात. त्यांच्या समोर सात ते नऊ वयोगटातली दहा मुलं बसली आहेत. ती काहीच बोलत नाहीत. प्रतिभा फळ्यावर लिहितात, मागे वळून मुलांकडे बघतात आणि त्यांच्या ‘हाताने’ फळ्याकडे इशारा करत मुलांना म्हणायला सांगतात, ‘‘पाच!’’
प्रतिभांचे हात कोपरापर्यंत आहेत आणि पाय गुडघ्यापर्यंत. चामडं आणि स्टील यांच्यापासून तयार केलेले पायांच्या खुंटांचे ‘संरक्षक’ त्यांना दिलेले आहेत, त्यांच्या आधाराने त्या उभ्या आहेत. बुटांसारखेच, पण मोठे आणि जडही असणारे हे संरक्षक दोन्ही गुडघ्यांतून घातलेले आहेत आणि खडूचा एक तुकडा वेलक्रोच्या मदतीने कोपराजवळ बांधलेला आहे.
‘शाळा’ चालू आहे... पालघर जिल्ह्यातल्या कर्हे गावातल्या हिलीम कुटुंबाच्या तीन खोल्यांच्या सिमेंटच्या घरात ती रोज भरते आहे. गेल्या जुलैपासून प्रतिभा इथे मुलांना इंग्रजी, इतिहास, मराठी आणि गणित शिकवतायत. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या या गावातली तीस आदिवासी मुलं त्यांच्याकडे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत गटागटाने येतात. १,३७८ लोकसंख्या असलेल्या या गावात जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत आणि शाळांमधून मुलांना पुस्तकं दिली आहेत. तीच घेऊन मुलं प्रतिभांकडे येतात.
‘‘ऑपरेशनपासून अगदी छोट्याछोट्या गोष्टी करायलाही मला खूप वेळ लागतोय. हे असं लिहिणंही कठीण होतंय...’’ प्रतिभा सांगतात. त्यांची एक विद्यार्थिनी त्यांच्या हाताला वेलक्रोने खडू बांधत असते.
वारली आदिवासी असणाऱ्या प्रतिभा हिलीम गेल्या वर्षीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवत होत्या. गेली २८ वर्षं नोकरी करतायत त्या शिक्षिकेची. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि त्या भिवंडी शहरात राहायला गेल्या. त्यांच्या कर्हे गावापासून साधारण १०० किलोमीटरवर असलेल्या या शहरात त्यांचा नवरा, पांडुरंग हिलीम पाटबंधारे कार्यालयात नोकरी करत होता. (पन्नाशीचे पांडुरंग हिलीम आज या कार्यालयात वरिष्ठ लिपीक आहेत.) २०१५ मध्ये त्यांची ठाणे जिल्ह्यातल्या कळव्याला बदली झाली तेव्हा प्रतिभा आपली शिक्षिकेची नोकरी चालू ठेवण्यासाठी रोज कळव्याहून भिवंडीला ये-जा करत होत्या.
जून २०१९ पासून भिवंडीमधल्याच जिल्हा परिषदेच्या नव्या शाळेत प्रतिभाची बदली झाली. त्याच महिन्यात त्या कर्हे या आपल्या गावी आल्या होत्या. तशी महिन्यातून एकदा त्यांची गावी फेरी असायचीच. या वेळी मात्र त्या आजारी पडली. गँगरीन झाल्याचं निदान झालं. गँगरीनमध्ये शरीरातल्या ऊती मरतात. एखादा न दिसणारा आजार, जखम किंवा संसर्ग यामुळे त्यांना रक्तपुरवठा होत नाही आणि त्या मरतात.
त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचे दोन्ही हात कोपरापासून आणि पाय गुडघ्यापासून कापावे लागले.








