विकाश यादव आणि लक्ष्मण सिंग कमला मार्केटमध्ये येईतोवर दुपार होऊन गेलीये. बैलगाडीतून आलेत ते. जवळपास रोजच ते नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या या गर्दीच्या मालधक्क्यावर ते बैलगगाडीतून माल वाहून आणत असतात. शक्यतो हा माल सब्झी मंडी रेल्वे स्टेशनवळच्या उत्तर-मध्य दिल्लीच्या प्रताप नगरहून आणला जातो.
सहा किलोमीटर दूर असणाऱ्या या दोन्ही बाजारांमध्ये मालवाहतूकदार मालगाड्या आणि ट्रकमधून आणलेला माल जवळच्या अंतरावर नेण्यासाठी भाड्याने बैलगाड्या घेतात. यात लुधियानाहून येणारे सायकलींचे सुटे भाग, आग्र्याचे जोडे, पंजाब आणि मध्य प्रदेशातला गहू आणि दक्षिण भारतातून येणारे गाड्यांचे सुटे भाग असा विविध प्रकारचा माल असतो.
बैलगाडी चालकांच्या कामात माल भरणं आण उतरवणं दोन्ही समाविष्ट असतं. “एका खेपेसाठी टेम्पो १००० रुपये घेतो. बैलगाडी स्वस्त पडते, नाही तर आम्हाला कोण विचारतंय? आम्ही रोज दोन खेपा करतो आणि दिवसाला ८००-९०० रुपये कमवतो,” २३ वर्षांचा विकाश सांगतो.
मालवाहतूकदार आपापल्या गोडाउनमधून जवळच्या दुकानांमध्ये माल पोचवण्यासाठी देखील बैलगाड्यांचा वापर करतात. आणि बरेचसे दुकानदार बैलगाडीतून त्यांचा माल शहराच्या इतर भागात पोचवतात.
दिल्ली वाहतूक पोलिसांनी विशिष्ट वेळात आणि विशिष्ट भागातच बैलगाड्यांना परवानगी दिली असली तरी २७ वर्षीय लक्ष्मणच्या म्हणण्यानुसार, फारसे काही कडक नियम नाहीत. “आम्हाला काही परमिट लागत नाही किंवा चलन फाडावं लागत नाही. त्यामुळे आम्ही बैलगाड्या वापरतोय.”










