ऑगस्ट २०२० मध्ये बाळंतपणानंतर अंजनी यादव आपल्या आईवडलांच्या घरी आली. तिचं दुसरं बाळंतपण होतं ते. तेव्हापासून अंजनी सासरघरी गेलीच नाहीये. ती आणि तिची दोन मुलं आता तिच्या आईवडिलांबरोबर, बिहारमध्ये गया जिल्ह्यातल्या बोधगया तालुक्यातल्या बकरौर गावात राहातात. अंजनीच्या नवर्याचं गाव तिथून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, पण तिला त्याचं नावही सांगता येत नाही.
‘‘सरकारी रुग्णालयात माझी डिलिव्हरी झाल्यावर दोनच दिवसांत भाभींनी (जावेने) मला स्वयंपाक आणि घराची साफसफाई करायला सांगितलं. मी थोडी नाराजी दाखवली तर त्या म्हणाल्या, ‘मी बाळंत होऊन या घरात आले तेव्हा मीही हेच केलं होतं.’ माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या आहेत त्या. प्रसूतीच्या वेळी मला खूप रक्तस्राव झाला होता. मी बाळंत होण्याआधीही नर्सने मला सांगितलंच होतं की माझ्या अंगात रक्तच नाही, मला रक्तक्षय आहे, भरपूर फळं आणि भाज्या खायला हव्यात. सासरी राहिले असते, तर माझी परिस्थिती अधिकच बिघडली असती.’’
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण - ५ नुसार गेल्या पाच-सहा वर्षांत जवळजवळ सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांत मुलं आणि महिलांमध्ये रक्तक्षयाचं प्रमाण बरंच वाढलं आहे.
अंजनी त्यापैकीच एक आहे. तिचा नवरा, बत्तीस वर्षांचा सुखीराम गुजरातेत सुरतेत एका कपड्यांच्या कारखान्यात काम करतो. दीड वर्ष तो घरी आलेला नाही. ‘‘माझ्या बाळंतपणासाठी तो येणार होता, पण दोन दिवसांपेक्षा जास्त सुटी घेतली तर कामावरून काढून टाकू, असं त्याच्या कंपनीने त्याला सांगितलं. कोरोना बिमारीनंतर आम्हा गरिबांची परिस्थिती खूपच बिघडली आहे... आर्थिक, भावनिक आणि आरोग्य दृष्ट्या. आणि या सगळ्याला तोंड द्यायला मी एकटीच होते,’’ ती म्हणते.
‘‘नवरा नव्हता, मला खूपच अवघड होत होतं ही परिस्थिती हाताळणं. तिथून बाहेर पडण्याशिवाय मग पर्यायच राहिला नाही माझ्याकडे. बाळंतपणानंतरची काळजी वगैरे राहिलं बाजूला, इथे मला घरकामात कोणी मदतही करत नव्हतं, की माझ्या तान्ह्या बाळाला कोणी सांभाळत नव्हतं.’’ अंजनी यादव अजूनही ॲनिमिक आहे... या राज्यातल्या इतर अनेक स्त्रियांसारखी.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण - ५ च्या अहवालानुसार बिहारमधल्या६४ टक्के स्त्रियांना रक्तक्षय आहे.
कोविड १९ च्या संदर्भात २०२० चा जागतिक पोषण अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. हा अहवाल म्हणतो, ‘प्रजननक्षम वयाच्या स्त्रियांमधलं रक्तक्षयाचं प्रमाण कमी करण्याचं लक्ष्य गाठण्यात भारत अयशस्वी ठरला आहे. भारतात १५ ते ४९ वयाच्या ५१.४ टक्के स्त्रियांना रक्तक्षय आहे.’








