फक्त एका रात्रीत ताईबाई घुलेंचं एक लाखाचं नुकसान झालं.
४२ वर्षीय ताईबाई आणि त्यांची मेंढरं आपल्या गावाहून नऊ किलोमीटर अंतरावर, भाळवणीच्या शिवारात होती. आणि अचानक तुफान पाऊस सुरू झाला. “संध्याकाळी पाच पासून पाऊस सुरु झाला. बारा नंतर पाऊस वाढला,” धनगर समाजाच्या ताईबाई सांगतात. रान नुकतंच नांगरलेलं होतं. शेतात चिखल झाला. मेंढ्यांचे पाय चिखलात रोवले गेले. रानातनंच बाहेरच पडता येईना. मेंढपाळांनी तशाही स्थितीत मेंढरांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला.
“अख्खा पाऊसच आम्ही अंगावर काढला. मेंढरांसोबत चिखलात बसलो,” त्या सांगतात. घटना डिसेंबर २०२१ ची. अहमदनगर जिल्ह्यातल्या भाळवणीच्या शिवारात पाऊस वेड्यासारखा बरसला.
“आम्ही जोराचा पाऊस पाहिलाय हो, पण असली नुसकानी कधी व्हायची नाही. पहिल्यांदाच घडलं हे असलं,” ताईबाई सांगतात. ढवळपुरीच्या ताईबाईंच्या आठ मेंढ्या आणि एक बकरी दगावली. “मेंढ्या वाचवायच्या एवढंच आम्हाला समजत होतं.”
१ आणि २ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी पाहिली तर सातारा जिल्ह्याच्या सगळ्याच तालुक्यात सर्वात जास्त, जवळपास १०० मिमी पाऊस झाल्याचं आपल्याला दिसतं.









