तिच्या खिडकीतून पाहिल्यास, नजर जाईल तिथवर पाणीच पाणी दिसतं. ते पाहत रूपाली पेगू म्हणते, "यंदा पुराचं पाणी ओसरलंच नाही." तिचं घर सुबनसिरी नदीपासून अवघ्या एक किलोमीटरच्या परिघात आहे. सुबनसिरी ही ब्रम्हपुत्रा नदीची एक मुख्य उपनदी. आसामचा हा परिसर दरवर्षी पुराच्या पाण्याखाली जातो.
"सगळीकडं नुसतं पाणीच पाणी. पण प्यायच्या पाण्यासाठी मात्र आम्हाला वणवण करावी लागतीये," ती सांगते. आसाममधील लखीमपूर जिल्ह्यातलं बोरडुबी मलुवाल हे तिचं गाव. पुरामुळं या भागातील पाण्याचे साठे दूषित होतात. "हातपंपाचंही पाणी घाणच. पाणी जमिनीखालून सगळीकडं एकच ना, मग आसपासच्या सगळ्या हातपंपालाही तसलंच पाणी येतं," रूपाली समस्येची तीव्रता समजावून सांगते.
दूर रस्त्यालगत एक हातपंप आहे, पुराच्या पाण्यातून तिथवर जायला मचवा-छोट्या बोटीशिवाय पर्याय नाही. मचव्यात पाण्यासाठी ती तीन ड्रम ठेवते. लांबलचक बांबूनं काळजीपूर्वक होडी वल्हवत ती हातपंपाच्या दिशेला निघते. "मोनी, चल येतेस ना!" ती शेजारणीला नेहमीप्रमाणे हाक मारते. या मैत्रिणी पाण्याचे कंटेनर भरायला एकमेकींचा आधार आहेत.








