अरततोंडीच्या गल्लीबोळांमध्ये मन मोहून टाकणारा, गोड आणि जरासा चढणारा वास भरून राहिलाय.
प्रत्येक घरासमोर बांबूच्या चटया, मऊ रग किंवा मातीच्या अंगणात पिवळ्या, पोपटी किंवा तपकिरी रंगाची मोहफुलं सुकत घातलेली दिसतात. पिवळी आणि पोपटी फुलं अगदी ताजी, नुकतीच गोळा केलेली आणि तपकिरी किंवा काळपट झालेली म्हणजे वाळून कडक झालेली.
निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि महुआ मात्र पूर्ण बहरात आहे. महाराष्ट्राच्या गोंदियात आहोत आपण.
“एप्रिलमध्ये मोह आणि मे महिन्यात तेंदू. आमच्याकडे हेच तर आहे.” रोज सकाळी ३५ वर्षांच्या सार्थिका ताई आणि गावातले बाकी माना आणि गोंड आदिवासी असलेले इतर बरेच जण गावाभोवतीच्या जंगलात जातात ४-५ तास तिथल्या पानांना लाल झाक आलेल्या मोहवृक्षांखाली पडलेली ताजी फुलं गोळा करतात. दुपारी पारा ४१ अंशापर्यंत पोचतो. तलखी असह्य होते.
मोहाच्या एका झाडापासून किमान ४-६ किलो फुलं मिळतात. अरततोंडी (स्थानिक लोकांच्या भाषेत अरकतोंडी) गावातले लोक बांबूच्या टोपल्या किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये फुलं आणतात आणि आपापल्या घरासमोर अंगणात वाळू घालतात. वाळलेल्या फुलांना किलोला ३५-४० रु. भाव मिळतो. एक व्यक्ती दिवसभरात ५-७ किलो फुलं गोळा करू शकते.
















