थकून गेलोय मी. माझं शरीर आणि मन सुन्न झालंय. डोळे भरून आलेत... माझ्या अवतीभवतीच्या शोषित-पीडितांच्या मृत्यूच्या वेदनांनी! अनेक विषयांवर काम झालंय, पण त्यावर लिहिणं काही मला जमत नाहीये. आतल्या आत जणू बंद पडलोय मी. ही गोष्ट लिहायला मी सुरुवात करत असतानाच चेन्नईच्या अनागापुथुरमधे सरकार दलितांची घरं पाडतंय. मी आणखीनच गळून गेलोय...
तामिळनाडूतल्या होसूर इथं ७ ऑक्टोबर २०२३ला फटाक्यांच्या गोदामात स्फोट झाला होता. ती घटना, त्यात झालेले कामगारांचे मृत्यू यापासून मी आजही स्वत:ला दूर ठेवू शकत नाहीये. मी आतापर्यंत २२ मृत्यूंची नोंद केली आहे. त्यापैकी आठ विद्यार्थी होते; १७ ते २१ या वयोगटातले. हे सर्व जण फटाक्यांच्या गोदामांमध्ये कामाला होते. आठही विद्यार्थी फक्त एकाच शहरातले होते असं नाही तर ते एकमेकांचे खास मित्रही होते.
मी छायाचित्रीकरण शिकायला सुरुवात केली तेव्हापासून फटाक्यांचे कारखाने, गोदामं आणि दुकानांमध्ये काम करणाऱ्यांबद्दल मला कुतूहल वाटत आलंय. बऱ्याचदा प्रयत्न करूनही मला आवश्यक त्या परवानग्या मिळू शकल्या नाहीत. मी हरतऱ्हेने चौकशी केली पण त्यातून मला एकच सांगितलं गेलं- गोदामं कधीही परवानगी देणार नाहीत. आत जाणंच जिथं सोपं नाही, तिथं फोटो काय काढणार!
दिवाळीला माझ्या आई-वडिलांनी आमच्यासाठी नवे कपडे किंवा फटाके विकत घेतले नाहीत कधीच! ते परवडत नसे त्यांना. माझ्या वडिलांचे मोठे भाऊ म्हणजे आमचे थोरले काका आमच्यासाठी नवीन कपडे घ्यायचे. दिवाळी साजरी करायला आम्ही दरवर्षी काकांच्या घरी जायचो. ते आमच्यासाठी फटाकेही विकत आणायचे. माझ्या काकांची मुलं आणि आम्ही अशी सगळी मुलं फटाके उडवायचो.
फटाके उडवायला मला फारसं आवडायचं नाही. जसजसा मी मोठा होत गेलो, तसतसं मी फटाके फोडणं पूर्णपणे बंद केलं. दिवाळी आणि इतर सगळेच सण साजरे करणंही मी बंद केलं. छायाचित्रीकरणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि त्यानंतरच मला सर्वहारा वर्गाचं आयुष्य कसं असतं ते समजायला लागलं.
छायाचित्रीकरणाच्या माध्यमातून मी खूप काही शिकत गेलो. तशी तर दर दिवाळीत फटाक्यांच्या गोदामांना आग लागायची, अपघात व्हायचे. पण आधी अशा अपघातांचं मला फारसं काही वाटायचं नाही.





















