" तुम्हाला दिसतंयच, आम्ही फार पैशेवाले नाहीत. पण आम्हा गरीबांच्याही मेहमाननवाजीत कसूर नसतो! तकल्लूफ नका करू... या, या ना, तुमचं तहेदिलसे स्वागत..." करीम जाट हसतमुखाने म्हणतात. लखपत तालुक्यातील मोरी गावचा हा पंचेचाळीस वर्षीय गृहस्थ. हा माणूस त्यांच्यापैकी आहे, ज्यांच्या जीवनाबद्दल मी वर्षांनुवर्षे 'पारी'वर रिपोर्टींग करतोय. मागच्यावेळी मी येथील 'सावला पीर'चा उर्स अनुभवलेला. ती गोष्ट २०२४च्या मार्च महिन्यातली. तेव्हा इथून निघताना करीम जाटनं मला ईदला पुन्हा यायचं निमंत्रण दिलेलं. त्या वचनाचा आदर ठेवून यंदा २०२५च्या मार्चमध्ये मी पुन्हा गुजरातमधील कच्छच्या मोरी गावाकडे कूच केली.
करीमभाई माझी वाटच पाहत होते. मला पाहताच मिठी मारत म्हणाले, "तुम्ही आलात, मला खूप खूप बरं वाटलं." करीमभाईंचा हर्षोत्साह नि स्नेह त्यांच्या शब्दांशब्दातून ओसंडतोय. "चला, थोडी गावात चक्कर मारू. रमजानची आखिरी नमाज थोड्या वेळानं होईल, तोवर आपण फेरफटका मारून येवू..." मोरी गावाचं आपलं एक अद्भूत सौंदर्य आहे. तसा हा ओसाड इलाखा. क्षितिजावर नजर गेली तर काटेरी निवडुंगांशिवाय काऽही दिसत नाही. पण कच्छच्या खाडीवरून येणारा सर्द वारा? इतका गारथंड की अगदी पाठीतले मणकेही शहारतील.
आम्ही चहेलकदमी करत एका छोट्या तळ्याकाठी येतो. नि:शब्दपणे आम्ही दोघे रखरखीत भवतालावर पसरलेल्या तापत्या सुर्याकडे पाहतोय. त्या शांतीचा भंग होतो, करीमभाईंच्या धिम्या आवाजानं, "मी सगळ्या उंटगाड्या विकून टाकल्या..." पुढं ते म्हणतात, "पण अजूनही दोनशे उंट आहेत माझ्याकडे, माझा धाकटा पोरगा पाहतो आता ते काम. पण आमदनीचा वांदा झालाय, उंटांना चरायला कुरणंच राहिली नाहीत...कमाई तरी कशी होईल!" ते घडीभर काहीच बोलत नाहीत. कदाचित त्यांच्या घशात आवंढा असेल. त्यामुळं किंचित खाकरून चटकन म्हणतात, "मगरीब की नमाज का वक्त हो चला है...कल ईद है, ऐसे पाक मौके पर शिकायते नही करनी चाहीए...चलिए, साथ मिलकर ईद मनाते है..."










