फोनची रिंग ट्रिंग ट्रिंग होताच, किरीट सावध झाला. डेस्कटॉप समोर बसून त्यानं हेडफोन कानांवर ठेवले. पाठीचा कणा ताठ करत त्यानं टिपणवही नि पेन घेतलं. मग मृदू आवाजात म्हणाला – “नमस्कार, शिवार हेल्पलाइनवर आपलं स्वागत!”
हा फोन नांदेड जिल्ह्यातून आलेला. कॉल करणारी स्त्री : पार्वतीबाई. आवाजावरून ती तिशीचाळीशीतली असावी.
२० वर्षीय किरीटचा दिलासादायी स्वर, “ताई, मी तुमची काय मदत करू शकतो?” किरीट परभणीचा. पुण्यात मानसशास्त्रात बी.ए. करतोय.
पार्वतीबाई कापऱ्या आवाजात म्हणतात, “पावसानं सगळा इस्कोट केलाय.” मग त्या पॉज घेतात. आपली गत परक्याला सांगावी का? हा संकोच तो पॉज लांबवतो. मग बळ एकवटून पार्वतीबाई घडघडा बोलू लागतात, “सोयाबीनबी ग्यालं न् तूरबी उलातथली, आजून काय सांगू, शेरडंबी वढून न्हेली पुराच्या पाण्यानी...आम्हाला कराय काय कामच ठिवलं नाय ढगातल्या देवानं...” पार्वतीबाईंचं खरीपाचं पीक तर गेलंच. शेळ्याही वाहून गेल्या. त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार मात्र होता तसाच शाबूत. सगळा परिसरच पावसानं झोडपलेला, रोजगार तरी कुठं नि कसा मिळणार? रब्बीचा हंगाम तोंडावर आलाय. पण पेरायला बी नाही. अशी अवस्था.
“निदान पेरायपुरतं हरभऱ्याचं बियाणं मिळालं, तरी आम्ही तगून जाऊ.” ही मदत मागताना पुन्हा पार्वतीबाईंचा स्वर संकोचतो.

























