“नुसतं चाक फिरवलं म्हणजे काही मडकं घडवता येत नाही; आपण जे बनवतो त्याला गोंजारायला पाहिजे,” सुदामा पंडित म्हणतात. ते बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील रसूलपूर सोहवान या गावातील एका वाडीवरचे कुंभार आहेत. “हे अगदी आपल्या पोटच्या मुलाला वाढवण्यासारखं आहे बघा... पहिले तर त्याला काळजीपूर्वक घडवून आकार देणं, आणि नंतर त्याला भट्टीतील गरमी देऊन मजबूत बनवणं.”

आता ५४ वर्षांचे असलेले सुदामा वयाच्या १५ व्या वर्षी मातीकाम शिकले. “माझे आजोबा फार कुशल कारागीर होते, पण माझ्या वडलांना या कामात रस नव्हता. त्यामुळे माझ्या आजोबांनीच मला ही कला शिकवली, आणि गावकरी मला या कलेचा ‘खरा’ वारस मानतात – सुदामा कुंभार,” ते अभिमानाने सांगतात.

भल्या पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटात सुदामांचा दिवस सुरु होतो. त्यांच्या पत्नी सुनीता देवी अंगणाची झाडलोट करतात, चाकातून आणि इतर उपकरणांतून आदल्या दिवशीची वाळलेली माती काढतात. सुदामा नवीन गारा तयार करतात. “जेवढं लवकर काम सुरु करावं तेवढं चांगलं – मी बनवलेल्या वस्तू वाळायला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे,” ते म्हणतात.

सुदामा जी माती वापरतात ती जवळपास २५ किमी दूर, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कुरहानी भागातील तुर्की गावातून आणली जाते. “आमचे आजोबा होते तेंव्हा आम्ही घराजवळच ३० फूट खोल जमीन खोदायचो. आम्हाला चांगली माती मिळत असे,” सुदामा म्हणतात. त्यांच्या मते पूर्वी कुंभारकाम कौटुंबिक व्यवसाय असल्याने बरेच हात मदतीला येत असत. आता त्यांना दिवसभर  एवढं खोल खोदणं परवडत नाही. शिवाय, ते म्हणतात, खोदण्यापेक्षा माती विकत घेणं जास्त सोयीस्कर असतं: “आता जमिनीतून माती खोदून काढायची यंत्रं आली आहेत आणि आम्हाला पैसे देऊन माती विकत घेता येते. पण, अशा मातीत दगड असल्याने ते काढून टाकण्यात बराच वेळ जातो.”

Sudama preparing dough
PHOTO • Shubha Srishti
Sudama's chaak
PHOTO • Shubha Srishti

सुदामा त्यांच्या घराच्या अंगणात माती चुरतात (डावीकडे), नंतर तिचा गोळा चाकावर ठेवतात, चाक फिरवतात आणि त्यातून पटापट आणि तेवढ्याच कौशल्याने विविध वस्तू घडवतात

बोलता बोलताच सुदामा १० किलो मातीचा गोळा त्यांच्या चाकावर लादतात आणि चाक फिरवतात, मातीच्या गोळ्याला लगेच आकार देतात. “निराकार मातीला आकार देणं ही ह्या हातांची कमाल आहे,” ते म्हणतात. त्यांच्या समाजाची बोली बज्जीका असली तरी आम्ही हिंदीत बोलतोय. हे चाक भोवऱ्याच्यासारख्या एका निमुळत्या होत गेलेल्या लहानशा दगडावर ठेवलं असून एका वेळी ते अंदाजे १० मिनिटं फिरत असतं.

आणि याच गोळ्यातून हरतऱ्हेच्या वस्तू तयार होतात – कुल्हड (चहा पात्र), मिठायांचा डबा, पणत्या, देशी मद्य बनवण्यासाठी लागणारी गबनी, कुलिया - चुकिया  (भातुकली), पारंपरिक लग्नात लागणाऱ्या वस्तू आणि देवांच्या मूर्ती.

मी रसूलपूर सोहवान पासून २ किमीवरच्या, तालुक्याच्या गावी, भगवानपूर गावात सुदामांनी बनवलेल्या भातुकलीशी खेळत लहानाची मोठी झाले. परंपरेने प्रत्येक कुंभाराची काही घरं ठरलेलीअसत, आणि त्या घरात लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मातीच्या वस्तू तो पुरवत असे. गरज पडल्यास तो घराला रंगरंगोटी देखील करून देई. सुदामा यांचं कुटुंब आमच्या घरी सर्व मातीची भांडी पुरवत असे.

भांड्याला आकार दिल्यावर सुदामा ते उन्हात वाळायला ठेवतात. ते एकदा वाळलं की सुदामा परत एकदा त्यावर हात फिरवतात आणि भांड्याच्या बुडाला ठोकन ( चोपणे ) घेऊन सपाट करतात आणि आतील बाजूला अर्धशंकू आकाराचंपीटन वापरूनत्याला सुबक आकार देतात. “उन्हातमवाळवलेली मातीची भांडी आव्यात भाजायला टाकली की त्यांची खरी परीक्षा असते,” ते म्हणतात. यासाठी ताडाच्या किंवा आंब्याच्या लाकडांना ओल्या मातीचा लेप देऊन भट्टी बनवण्यात येते. गायीच्या शेणाचा इंधन म्हणून वापर केला जातो. या कसोटीच्या प्रक्रियेतून केवळ चांगली मडकीच तावून सुलाखून बाहेर पडतात.

Sudama making a kulhad
PHOTO • Shubha Srishti
Sudama making a kulhad
PHOTO • Shubha Srishti

सुदामाच्या चाकावर अनेक हाताने घडवलेल्या वस्तू तयार होतात - कुल्हड (चहा पात्र, वरती), पणत्या, भातुकली, आणि देवांच्या मूर्ती, इत्यादी

दरम्यान जंगलातून वाळलेली पानं आणि फांद्या गोळा करून सुनीता देवी घरी परत येतात. त्या मडकी घडवण्याच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहेत, मात्र त्यांना स्वतःहून असं काही वाटत नाही. “मी मडकी बनवायला लागली तर लोक काय म्हणतील?” त्या विचारतात. “मला घरची कामं असतात. मात्र, वेळ मिळेल तशी मी त्यांना मदत करते. मीगोईठा [शेणाच्या गोवऱ्या] बनवते, मातीच्या वस्तू वाळवण्यासाठी लागणारंजलावन [सरपण] गोळा करते. पण, ते काही पुरेसं नाही- आठवड्यातून दोनदा आम्हाला १,०००-१,२०० रुपयांचं जळण विकत घ्यावंच लागतं.”

सुनीता आव्यावर किंवा भट्टीवर नजर ठेवतात आणि मडक्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेतात. “ज्या दिवशी भांडी भाजायची असतात, त्या दिवशी एक मिनिट जरी इकडे-तिकडे झालं तरी त्या वस्तू विकायच्या लायकीच्या उरत नाहीत,” त्या सांगतात. स्थानिक बाजारातूनआणलेल्या रंगांनी त्या वस्तूंची रंगरंगोटी देखील करतात. “अशी लहान-सहान बरीच कामं असतात- मला जरा पण बसण्याची उसंत नसते, मी सतत हे ना ते काम करत असते.”

या चाकातून सुदामा आणि सुनीता यांची होणारी मिळकत अनिश्चित असते. “मी इथे महिन्याला १०,००० रुपयांच्या वस्तू विकत असतो- यातला ४,००० रुपये एवढा आमचा नफा. पण, पावसाळ्यात तसेच थंडीच्या डिसेंबर-जानेवारी महिन्यात आमच्या धंद्याला चांगलाच फटका बसतो, कारण तेंव्हा वस्तू वाळायला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही,” सुदामा म्हणतात. सणवार आणि लग्नाच्या हंगामात - जानेवारीच्या मध्यापासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत आणि पुढे मेच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंत-हेदांपत्य महिन्याला वरचे ३,०००-४,००० रुपये कमावतं. काही वेळा सुदामांच्या मडक्यांना पुष्कळ मागणी असते आणि याचासुद्धा कमाईला हातभार लागतो.

Sudama making a pot's base
PHOTO • Shubha Srishti
Sudama shaping the pot
PHOTO • Shubha Srishti

ओल्या मातीला आकार दिल्यानंतर सुदामा ते भांडं किंवा वस्तू उन्हात वाळवतात. वाळल्यावर ठोकन (चोपणं) वापरून हलकेच ठोकत तिला सुबक आकार देतात

अशा अनियमित कमाईमुळेच सुदामा यांच्या दोन धाकट्या भावांनी, मल्लू आणि गब्बड, यांनी या व्यवसायात येण्याचं धाडस केलं नाही. ते दोघे आता गवंडी म्हणूनकाम करतात. आमच्याशी बोलत असलेले त्यांचे आणखी एक धाकटे भाऊ, कृष्णा, वेळ मिळेल तसं कुंभारकाम करतात पण मजुरी करण्यालाच प्राधान्य देतात. “या व्यापारातील उतार-चढाव मला परवडायचे नाहीत, शिवाय कमाई पण पुरेशी होत नाही. माझा भाऊ जास्त कुशल आहे आणि त्यानं आपले ग्राहक टिकवून ठेवलेत, त्यामुळे त्याला या व्यापारात टिकून राहता येईल,” ते म्हणतात.

सुदामा आणि शांती यांची मुलं देखील कदाचित  दुसराच व्यवसाय करतील. त्यांच्या दोन मुलींची लग्नं झाली आहेत. त्यांचा मोठा मुलगा, संतोष, वय २६, बँक भरतीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करायला दिल्लीत शिकतोय, आणि लहाना सुनील, वय २४, भगवानपूर येथे गणिताचे वर्ग घेतो, तिथेच तो बी.एस्सी. पदवीचं शिक्षण घेत आहे.

“माझ्यानंतर हा वारसा पुढे नेणारं कोणीच नाही,” सुदामा म्हणतात.  त्यामुळेच ते वेगात काम करणारं, मोटरीवर चालणारं चाक घेऊ पाहत नाहीत. खर्चाचं तर सोडाच (नेमका खर्च किती हे त्यांना ठाऊक नाही), कुटुंबातील इतर कोणीच हे काम करणार नसेल, तर ही गुंतवणूक वाया जाईल, असं ते म्हणतात.

Sudama and Sunita with cement sculpture
PHOTO • Shubha Srishti
Sudama’s workshop
PHOTO • Shubha Srishti

सुदामा आणि त्यांच्या पत्नी सुनीता(डावीकडे) जास्त करून मातीच्याच वस्तू तयार करतात, मात्र आता त्यांनी सिमेंटची शिल्पंही बनवायला सुरुवात केली आहे – ते आकार देतात, त्या वस्तूला पाणी घालतात

शिवाय, हा व्यापार तसाही उतरणीला लागला आहे. “अॅल्युमिनियम, प्लास्टिक आणि स्टीलच्या वस्तूंचा वापर वाढत चालल्याने मातीची भांडी वापरणं आता कमी होत चाललं आहे,” ते म्हणतात. “अशी भांडी आता [रोजच्या स्वयंपाकासाठी नाही] केवळ सणासुदीला आणि खास पदार्थ बनवताना वापरली जातात.”

याच कारणाने सुदामा यांच्या वाडीवरच्या अनेकांना हा व्यवसाय सोडणं भाग पाडलंय. “सुमारे १५ वर्षांपूर्वी छतासाठी सिमेंटचे पत्रे वापरायला सुरुवात झाली. अगोदरखपडा [कौलं किंवा खापरं] बनवणं आमच्यासाठी नफ्याचं काम होतं,” सुदामा म्हणतात. “कुंभारटोल्यात पूर्वी १२० कारागीर कुटुंबं राहत असत, आता हा आकडा केवळ आठवर येऊन पोचलाय.”

सुदामांना या गोष्टीचं दुःख असलं तरी त्यांची उमेद कायम आहे. ते अजूनही प्रयोगशील आहेत आणि त्यांनी नवी कौशल्यं शिकण्याचा प्रयत्न केलाय. २०१४ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील  मिर्झापूरजवळील चुनर शहराला भेट दिली. हे शहर तेथील प्लास्टर ऑफ पॅरिस आणि सिमेंटवर काम करणाऱ्या कुशल कारागीरांसाठी प्रसिद्ध आहे. इथेत्यांनी या घटकांपासून शिल्पं कशी बनवायची, हे शिकून घेतलं. यंत्रांच्या मदतीने बारीक नक्षीकामदेखील करता येतं आणि यांचा बाजारात प्रचंड खप आहे. इकडे सुदामा यांनी देखील सिमेंटवर काम करणं सुरु केलं आहे, त्यांनी बनवलेल्या शिल्पांना चांगली रक्कम मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.

त्यांचा व शांती यांचा संसारदेखील पार बदलून गेला आहे. “आम्हीसुद्धा स्वयंपाकात मातीची भांडी वापरत नाही, आम्ही अॅल्युमिनियमची भांडी वापरतो,” ते म्हणतात. “कमी खर्चात ढीगभर तयार होणाऱ्या या भांड्यांना आम्ही टक्कर देऊ शकत नाही. असे उतार-चढाव पाहिले की मला पण माझ्या मुलांनी कुंभार व्हावं असं वाटत नाही. शहरात त्यांना किती तरी संधी उपलब्ध आहेत.”

अनुवादः कौशल काळू

Shubha Srishti

Shubha Srishti is a student in the MPhil-PhD programme at the School of Social Work, Tata Institute of Social Sciences, Mumbai.

Other stories by Shubha Srishti
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo